शेतकरी चळवळीला बळ गरजेचे
भाऊ ठाकूर
राहू – दौंड हे ऊस उत्पादनाचे आगार असले तरी ऊस दराबाबत दौंडकर हे कायमच मागे असतात. आज दुष्काळसदृश परिस्थिती आहे.गाळप योग्य उसाचे क्षेत्र हे कमी ऊपलब्ध आहे. परंतु अजूनही दौंडमधील कोणत्या ही कारखान्याने बाजारभाव जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेजारील बारामती, इंदापूर, आंबेगाव या ठिकाणच्या सहकारी कारखान्यांनी काही प्रमाणात का होइना बाजारभाव जाहीर केले आहेत. परंतु दौंडमध्ये होत नाही. दौंडमध्ये नाही म्हणले तरी चांगल्या प्रकारे उसाचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळे स्पर्धा निर्माण झाली आहे. परंतु स्पर्धेचा शेतकऱ्यांना कधीही फायदा होताना दिसत नाही.
यंदा दौंडमध्ये दौंड शुगर, भीमा पाटस, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज शुगर व शिरूरमधील व्यंकटेश कृपा हे पाच कारखाने चालू होऊ शकतात. यापैकी दौंड शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा व व्यंकटेश कृपा या कारखान्यांनी गाळप सुरू देखील केले आहे.परंतु बाजार भावाबाबत अजून काहीही जाहीर केलेले नाही.
यंदा दौंड शुगरची गाळप क्षमता वाढून 17 हजार टनांपर्यंत केलेली आहे. भीमा पाटस हा देखील मोठ्या प्रमाणात गाळप करू शकतो. श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याने देखील आपली क्षमता वाढविली आहे तर व्यंकटेश कृपा देखील बेट परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करू शकतो. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असणे आवश्यक आहे.परंतु उसाची उपलब्धता खूप कमी आहे.
बाजारभावाच्या नियमानुसार मागणीपेक्षा पुरवठा कमी असेल तर त्या मालाची किंमत ही आपोआप वाढत असते. परंतु दौंडमध्ये हा नियम अपवाद असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी प्रत्येक कारखाना हा बॉयलर पूजनावेळी किंवा मोळी पूजनावेळी इतर कारखान्यांच्या बरोबरीने बाजारभाव दिला जाईल, अशी गोंडस घोषणा केली जाते. परंतु इतर कारखान्यांच्या इतका म्हणजे किती, हे कोडे शेतकऱ्याला चाळीस वर्षांत अजून उलगडलेले नाही.
इतर कारखान्यांच्या बरोबरीने म्हणत असताना कोणत्याच कारखान्याचा बाजारभाव हा सारखा दिसून येत नाही. काही कारखाने म्हणतात की, आम्ही एफआरपी पूर्ण केलेली आहे.तर दौंड शुगर कारखाना हा थोड्या फार प्रमाणे इतर कारखान्याच्या पुढे आहे.
शेतकरी संघटनांनी आक्रमक व्हावे
कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत ज्याप्रमाणे शेतकरी संघटना आक्रमकपणे काम करतात. त्या मानाने पुणे जिल्ह्यात शेतकरी संघटना या आक्रमक होताना दिसून येत नाही. जर काही संघटना असतील त्यांनी आक्रमकता ठेवली तर शेतकरी चळवळीला उभारी येईल.
स्वतः हून तोडी थांबवण्याची गरज
शेतकऱ्यांनी देखील शेतकरी संघटनांच्या भरोशावर न राहता कारखान्याला उस तोडी दिल्या नाहीत तरी देखील काहीतरी निर्णय होऊ शकतो. परंतु तसे देखील होताना दिसून येत नाही.