पुणे – दिवाळी अर्थात दीपोत्सावाचा आरंभ वसुबारसेपासून होत असतो. दिवाळीचा पहिला दिवा या दिवसापासून लावला जातो. यंदा दि. 9 नोव्हेंबर रोजी वसुबारस अर्थात गोवत्सद्वादशी साजरी केली जात आहे. त्याचे आणि दिवाळीतील अन्य दिवसांचे महत्त्व, त्याचे मुहूर्त आणि धार्मिक परंपरा याबद्दल अधिक माहिती खास “प्रभात’च्या वाचकांसाठी…
दिवस पहिला : वसुबारस, गुरुवार, दि. 9 नोव्हेंबर
आकाशकंदील लावणे आणि वसुबारस (गोवत्सद्वादशी). सायंकाळी 6.44 ते 8.44 वाजेपर्यंत सवत्स (वासरू असलेल्या गायीचे) गाईचे पूजन करणे. समुद्र मंथनातून “नंदा’ नावाची कामधेनू गाय निघाली. यादिवशी वासरू असलेली गाय यांची पूजा करून नैवेद्य दाखवून अर्पण केला जातो.
दिवस दुसरा : धनत्रयोदशी, शुक्रवार, दि. 10 नोव्हेंबर
सायंकाळी कणकेचा दिवा करून त्याच्या ज्योतीचे दक्षिणेकडे तोंड (ज्योत) करून ठेवणे. याला यमदीपदान म्हणतात. धनत्रयोदशीनिमित्त सायंकाळी दागदागिने, द्रव्य, गणेश, विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग, आणि द्रव्यनिधी आदींचे पूजन करून नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. या दिवशी सायंकाळी घरोघरी धनलक्ष्मीचे पूजन करतात. देवदेवतांचे पूजन झाल्यावर खीरीचा नैवेद्य दाखवण्यात येतो.
या दिवशी रात्री “यमदीपदान’ करण्याची पद्धत आहे. अवेळी येणाऱ्या संकटांपासून सुटका व्हावी, यासाठी “दीपदान’ करण्याची श्रद्धा आहे. व्यापारी वर्गात “धनतेरस’ या नावाने धनत्रयोदशी साजरी केली जाते. पुढील आर्थिक वर्ष निर्वेध उलाढालींचे व्हावे या उद्देशाने बाजारपेठांत कुबेरपूजन करण्याची पद्धत आहे.
दिवस तिसरा : नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन
रविवार दि. 12 नोव्हेंबर
नरकचतुर्दशी – अभ्यंग स्नान
वेळ – पहाटे 5.33 वा.
लक्ष्मीपूजन (अमावास्या) प्रारंभ दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनंतर
श्री लक्ष्मी आणि कुबेर पूजन (वेळ – सायंकाळी 6 वा. 07 मिनिटांपासून
ते रात्रौ 08 वा. 07 मिनिटांपर्यंत
लक्ष्मी पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक आणि व्यवहारिक मूल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसून ती “श्री’ या संकल्पनेवर आधारित आहे. “श्री’ म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, सत्ता, आरोग्य, समृद्धी, यश, प्रतिष्ठा, मान सन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे.
या काळात शुचिर्भूतपणे श्रीमहालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मूर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करुन पूजन करावे. चांदीच्या लक्ष्मीचे पूजन करावे. कारण लक्ष्मी पूजनात चांदीचे महत्त्व मानले जाते. पूजा पंचोपचार केली तरी चालेल (म्हणजे स्नान, धूप, दीप, गंध आणि नैवेद्य) मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रद्धेचा असावा.
बरेचदा श्रीलक्ष्मीपूजन करताना अनवधानाने श्रीविष्णूंचे स्मरण-प्रार्थना करणे राहून जाते (श्रीमहालक्ष्मी तत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जिथे विष्णूंचे स्मरण-प्रार्थना होते, त्या ठिकाणी तिचा निवास रहातो. कारण ती विष्णुंशिवाय रहात नाही. त्यामुळे तिची पूजाअर्चना करण्याआधी विष्णूदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे. नुसते मानसिक स्मरण केले किंवा “ॐ नमो भगवते वासुदेवाय’ म्हटले तरी चालते, अशी मान्यता आहे.
दिवस चौथा : बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा)
बलिप्रतिपदा वही पूजन करावे आणि दीपावली पाडवा (साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त) गोवर्धन पूजा करावी (गोठा करणे)
दिवस पाचवा : भाऊबीज (यमद्वितीया)
बुधवार, दि. 15 नोव्हेंबर. यमपूजन अर्घ्य दान आणि तर्पण करावे, तसेच महिला-मुलींनी भावाचे औक्षण केले जाते. गोड पदार्थ भावाला भरवले जातात.