बारामती -राज्यातील मेंढपाळ समाजाला संरक्षण तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. याबाबत पोलीस महासंचालकांना निर्देश दिले जातील, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिली असल्याची माहिती नवनाथ पडळकर यांनी दिली.
जनता राज अभियान आयोजित मेंढपाळ हक्क परिषदेतील प्रमुख मागण्यावर चर्चा करण्यासाठी गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात गुरूवारी (दि. 1) बैठक आयोजित केली होती. बैठकीत धनगर समाजातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये राज्यात मेंढपाळांवर हल्ले होत असून त्यावर कायमचा उपाय म्हणून मेंढपाळ संरक्षण कायदा मंजूर करावा.
मेंढपाळावर होणारा हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा म्हणून नोंद केला जावा व तसा कायदाच करून संरक्षण प्राप्त व्हावे, मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी व पशुधन संरक्षणासाठी शस्त्रासाठी कायदेशीर अधिकार म्हणून दर्जा बहाल करावा. बंदुकीचा परवानाही द्यावा, धनगर आरक्षण आंदोलनातील आंदोलक तसेच समाजसेवक यांच्यावर 20 वर्षांत नोंदविलेले व दाखल केलेले विविध प्रकारचे गुन्हे मागे घ्यावेत.
आदी मागण्या शिष्टमंडळाने यावेळी मांडल्या. मेंढपाळ हक्कनामा मंजूर करावा, असा आग्रह नवनाथ पडळकर यांनी गृहमंत्र्यांसमोर धरला. यावेळी राज्यमंत्री दत्ता भरणे, माजी आमदार रामराव वडकुते, रमेश शेंडगे, हरिभाऊ भदे, प्रकाश शेंडगे, उत्तम जानकर, नवनाथ पडळकर, गणेश हाके, अनिल गोयकर, सक्षना सलगर, मल्लिकार्जुन पुजारी, आनंद कोकरे आदी नेते व मेंढपाळ बांधव प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
धनगर समाजासह इतर समाजातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन गृहमंत्री यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. याबाबत पोलीस महासंचालकांना लवकर निर्देश देण्यात यावेत. तसेच आंदोलकांवरील गंभीर व किरकोळ स्वरूपातील सर्व प्रकारचे गुन्हे मागे घेण्यात यावेत.
– किशोर मासाळ, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस.