नारायणगाव येथे कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
जिल्हाध्यक्ष बुट्टे पाटील : प्रदेशअध्यक्ष गुरुवारी शिरूर लोकसभा दौऱ्यावर
नारायणगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या 9 वर्षांत केलेले काम सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी “घर चलो अभियान’ आणि “बूथ सशक्तीकरणसाठी’ कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी दिली.
वारुळवाडी (ता.जुन्नर) येथील सार्वजनिक बांधकाम विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बुट्टे पाटील बोलत होते. यावेळी भाजपच्या विधानसभा निवडणूक प्रमख आशा बुचके, तालुका अध्यक्ष संतोष खैरे, जिल्हा सचिव आशिष माळवदकर आदी उपस्थित होते.
प्रत्येक विधानसभेतील सुपर वॉरियर्स कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी (दि. 12) शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत असून जुन्नर, आंबेगाव आणि खेड-आळंदी विधानसभेतील कार्यकर्त्यांशी नारायणगाव येथे तर शिरूर-हवेली, हडपसर आणि भोसरी विधानसभेतील कार्यकर्त्यांशी भोसरी येथे असे एकूण 1 हजार प्रमुख कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लोकसभा प्रवास योजना राज्यसेवेचे संजय भेगडे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, आमदार राहुल कुल,आमदार महेश लांडगे यांच्यासह तालुका, जिल्हा, राज्यपातळीवरील नेते उपस्थित राहणार आहेत.