सोमेश्वरनगर -सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अतिरिक्त ऊस गाळपाची जबाबदारी कृती समिती घेणार काय, असा खडा सवाल सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केला आहे. कृती समितीने खोडसाळपणा बंद करा, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, जगताप यांच्या सवालाने सोमेश्वरच्या टापूत गाळप हंगामात आणि ऐन दिवाळीत आपटबार फुटू लागले आहेत.
जगताप म्हणाले की, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वीरित्या सुरू आहे. कारखान्याची सध्या प्रतिदिन 5 हजार टन गाळप क्षमता आहे. अधिकारी, कामगारवर्गाच्या सहकार्याने प्रतिदिन 6 हजार टन याप्रमाणे गाळप सुरू आहे. यावर्षी शेतकी विभागाच्या सर्व्हेनुसार जवळपास 12.50 ते 13 लाख टन ऊस सभासदांचा कार्यक्षेत्रात उपलब्ध होणार आहे.
एप्रिलपर्यंत कारखाना गाळप सुरू ठेवून 11 लाख टनाचे गाळपाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवलेले आहे. कारखान्याकडे अतिरिक्त ऊस उपलब्ध आहे. त्याचे गाळप करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे.
परंतु एकीकडे अतिरिक्त ऊस गाळपाचे नियोजन करीत असताना विनाकारण कारखान्याच्या हंगामात व्यत्यय आणायचा ही कृती समितीची नेहमीची खोड आहे. अतिरिक्त ऊस गाळपाची जबाबदारी कृती समिती घेणार काय, असा सवाल जगताप यांनी शेतकरी कृती समितीस केला.
जगताप म्हणाले की, गेल्या 7 वर्षांत कारखान्यामध्ये वेगवेगळ्या दुरुस्त्या व सुधारणा केल्या आहेत. मोलॅसिस टॅंक, इथेनॉल टॅंक, इव्हॉपोरेटर बॉडी, व्हॅक्युम पॅन व इतर दुरुस्त्या केल्यामुळे कारखाना सुरु झाल्यापासून बंद होईपर्यंत तीन हंगामात 6 हजारांपेक्षा अधिकचे गाळप करीत आहोत. या सर्व भांडवली गुंतवणुका कारखान्याने कोणतेही कर्ज न घेता स्व: भांडवलातून उभे केले आहे.
जगताप म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वरची यशस्वी वाटचाल सुरू आहे. गाळप हंगाम 2019-20 करिता कारखान्याची एफआरपी 2789 रुपये इतकी असताना अंतिम दर कारखान्याच्या ताळेबंद नफातोटापत्रकाप्रमाणे 3 हजार रुपये दिला आहे. एफआरपीपेक्षा प्रती टन 211 रुपये जादा देणारा कारखाना राज्यात पहिलाच कारखाना आहे. याचा सर्वांना अभिमान आहे.
यापूर्वी 20 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. किमत चढ उतार निधीची तरतूद ही भविष्यातील संकट काळासाठी आहे. कामगारांसाठी स्टाफ क्वॉटर्स, सभासदांच्या मुला-मुलींसाठी कॉलेज इमारत, मुलांकरिता एक सुसज्ज वसतिगृह, सभासदांच्या ऊस वाहतुकीसाठी रस्ते, कारखान्याचे अधिकचे दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी गेलेल्या दुरुस्त्या, यंत्रसामुग्रीमधील विविध दुरुस्त्या हे कोणतेही कर्ज न घेता करण्यात आले आहेत. त्याचे चांगले परिणाम गेल्या दोन ते चार हंगामात दिसत आहेत.
ज्या कामांमुळे हे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. ती कामे केली, याचा अर्थ संचालक मंडळाने चूक केली का, असा सवाल त्यांनी केला.सोमेश्वरपेक्षा अधिक गाळप क्षमतेचे कारखाने आहेत. ते कारखाने सध्या किती क्षमतेने गाळप करीत आहेत, याचा विचार कृती समितीने करावा. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून कारखान्याच्या वाटचालीत अडथळे निर्माण करायचे, खोडसाळपणाचे आरोप करायचे, हे उद्योग आता कृती समितीने थांबविले पाहिजेत.
काही लोकांना सोमेश्वरचे यश पाहवत नाही. त्यामुळे नैराश्येपोटी मूठभर लोकांना घेऊन विरोध करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न सभासद कदापि खपवून घेणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.