विजय शेंडगे
बऱ्याचदा लेखक त्यांच्या अवतीभोवतीच्या परिघाविषयीच लिहीत असतात. “चोळी’ ही सुरेश पाटोळे यांची कादंबरीही त्यांच्या आसपास वावरणाऱ्या वडार समाजावर बेतलेली आहे. त्यामुळेच वडार समाजातील चालीरीती, संस्कार यांचा राबता कादंबरीत जागोजागी आढळतो. 280 पानांची ही कादंबरी.
जगन हा या कादंबरीचा नायक. शिकतो. फुले-आंबेडकरांच्या विचाराने भारावून जातो. आपल्या समाजातल्या स्त्रिया चोळी वापरत नाहीत हे त्याला खटकत असतं. ही प्रथा मोडीत काढण्याचा तो चंग बांधतो. चोळी घालावी असा त्याच्या आईलाच आग्रह करतो. पुत्रप्रेमापोटी त्याची आई त्याचा हा हट्ट पुरवते. जात पंचायतीसमोर ही तक्रार जाते. वैगेरे वैगेरे.
दगड फोडीची कामं करून उदरनिर्वाह करणारा हा समाज. स्त्रियांनी चोळी वापरायची नाही अशी रीत पाळणारा हा समाज. आपल्या समाजाचे रीतिरिवाज कोणी मोडले तर ते गाऱ्हाणं जात पंचायतीसमोर घेऊन जाणारा, आणि जात पंचायत देईल ते निर्णय मानणारा हा समाज; परंतु याच समाजातल्या दोन मुली शिक्षण घेतात. जगनची नात नेहा एअर होस्टेस होते तर त्याचीच पुतणी स्मिता पायलट होते. खरंतर लेखकाला हा एवढाच प्रवास मांडायचा आहे. चोळी न वापरण्यापासून पायलट होण्यापर्यंत वडार समाजातील स्त्रीने केलेला प्रवास हेच या कादंबरीचं कथासूत्र.
विषय छोटा असला तरी लेखकाने तो अगदी ताकदीने मांडला आहे. वडार समाजाची समाज रचना डोळ्यासमोर उभी करण्यात लेखकाला यश आलं आहे. प्रभावी संवाद, ताकदीचं सामाजिक भाष्य या कादंबरीच्या जमेच्या बाजू आहेत. ही कादंबरी सत्य घटनेवर आधारित असल्याचं लेखक म्हणतो आणि टेक्सास गायकवाडपासून नामदेव ढसाळांपर्यंत अनेकांचा या कादंबरीतला वावर लेखकाच्या दाव्याला पुष्टी देतो.
भाषा मृत होऊ नये असे वाटत असेल, तर तिचा बोलीभाषेत, साहित्यात प्रभावी वापर व्हायला हवा. लेखकाला याचं भान आहे आणि त्यामुळेच त्यांनी संवादात ठिकठिकाणी वडार बोली भाषेचा वापर केला आहे. त्यामुळे भाषा समृद्धीचा प्रयत्न ही कादंबरी करताना दिसते. परंतु कोणतीही साहित्यकृती ही विशिष्ट समाज डोळ्यासमोर ठेवून लिहिली जात नाही. ती संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी लिहिली जाते. त्यामुळे वाचकाला कळणार नाही अशा एखाद्या भाषेचा त्या कादंबरीच्या संवादात वापर केला जात असेल तर त्या संवादाच्या खालीच कंसात मराठी रूपांतर देण्याची काळजी लेखकांनी घ्यायला हवी.
या कादंबरीच्या शेवटी वडार बोली भाषेतील शब्दांचे अर्थ दिले आहेत. परंतु ते शब्दार्थ देताना मराठी भाषेतील स्वर आणि व्यंजन यांच्या क्रमाने वर्गवारी केली असती तर ते वाचकाच्या दृष्टीने सोयीचे झाले असते. काही ठिकाणी कादंबरी पाल्हाळिक झाली आहे. असे असले तरी कादंबरी वाचकाच्या मनावर आपली छाप सोडण्यात यशस्वी झाली आहे हे नक्कीच. यशोदीप प्रकाशनाच्या रूपाली अवचरे आणि निखिल लंभाते यांनी कादंबरी अधिकाधिक देखणी होईल याची काळजी घेतली आहे.