लोणी काळभोर – चित्रकार कलेच्या माध्यमातूनच आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकार कलाकृती साकारत असतो तोपर्यंतच ती त्याच्या मालकीची असते. एकदा का त्याने तिच्यावर सही केली ती सार्वजनिक होते. इतिहासात कायमच योगदानाची नोंद राहते व्यवहाराची नाही. कारण, कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त आयुष्य घेऊन जन्मते, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी केले.
एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिझाइन आणि आर्किटेक्चरचा सर्वांत मोठा महोत्सव असणार्या कारी-2024 निमित्ताने राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे आयोजित ’विश्वारंभ कला पुरस्कार’ स्विकारल्यानंतर बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल, माईर्स एमआयटी शिक्षण समुहाच्या कार्यकारी संचालक ज्योती ढाकणे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. मिलिंद ढोबळे, डॉ. आनंद बेल्हे, डॉ. अश्विनी पेठे आदी उपस्थित होते.
कामत म्हणाले, आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण मी अप्लाईड आणि फाईन आर्टिस्ट आहे, असे सांगतो; परंतु माझ्या मते आपले कलाकार असणे आणि त्यापेक्षाही आपल्यातील कला’कारी’ अधिक महत्त्वाची असते. विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली, ज्याचे सूत्रसंचालन स्नेहा वाघटकर यांनी केले.
बंद आखोंसे देखे गये सपनों को जो साकार करें वो कलाकार होता है!, अगदी तशाच प्रकारे ’विश्वारंभ’, या नावातच काहीतरी नाविन्यपूर्ण तयार करण्याची संकल्पना जडलेली आहे. अर्थातच या नावामागे आणि या पुरस्कारामागे आमचे मार्गदर्शक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांची प्रेरणा आहे. जगातील सर्वांत मोठा विश्वशांती घुमट आणि विश्वराजबागेची बांधनी या त्यांच्याच दृष्टीतून साकारल्या गेलेल्या अप्रतिम कलाकृती आहेत.
-ज्योती ढाकणे-कराड, कार्यकारी संचालक माईर्स एमआयटी
जेव्हा मी कुठल्याही कलाकाराला विचारतो तेव्हा तो काहीतरी नवीन साकारतोय असे म्हणतो; परंतु जगात नवीन असे काहीच नाही. कारण एक कलाकार सर्वच गोष्टी आपल्या भवतालच्या गोष्टींना पाहून साकारत असतो. त्यात तो जी काही कलाकारी साकारतो ती इतिहासाचा अविभाज्य भाग होऊन जाते. कलाकारांच्या कलाकृती भविष्यातील पिढीशी संवाद साधण्याचे काम करतात. कलाकाराचा हात नाजूक असला तरी त्याची कलाकृती मात्र कणखर हवी.
-जब्बार पटेल, प्रसिद्ध दिग्दर्शक