निमसाखर -निरवांगी व खोरोची येथे नीरा नदीला व ओढ्यांना पाणी आल्याने सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 52 कुटुंबांच्या घरात पाणी शिरले आहे. पिकांबरोबरच जनावरे वाहून गेली आहेत.
नीरा खोऱ्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडले आहे. बारामती भागातील कऱ्हा नदी दुथडी भरुन वाहत आहे. 32 जनावरे वाहून गेली आहेत.
निमसाखरला पावसाळापूर्व कामे व्यवस्थित न झाल्याने गावात रस्त्याला ओढ्याचे स्वरुप आले होते. नीरा नदीचे पाणी 10 ते 12 घरांमध्ये व ओढ्याच्या पाण्यामुळे खंडोबानगर भागातील 32 घरे, अशा 42 जणांच्या घरात पाणी शिरले.
हे पाणी गावात सायंकाळी तर खंडोबानगर भागात रात्री घरात शिरण्यास सुरुवात झाली. घरातील धान्य, साहित्य पाण्यात बुडाले.
इंद्रजित वर्कशॉपमध्ये पाणी शिरल्याने 15 सिंलेडर वाहून गेले. मशीनरी भिजली. कागदपत्रे वाहून गेल्याने उद्योजक तुळशिदास काळे यांचे नुकसान झाले आहे. खोरोची गावातही 15 घरांमध्ये पाणी शिरले आहेत.
दत्तू सावंत 4, महादेव सावंत 2, नारायण सावंत 6, बाळासाहेब साखरे 7, पांडु ठोबरे 7 यासह अन्य शेतकऱ्यांची 30 ते 32 जनावरे वाहून गेली आहेत. तलाठी भागवत पिसाळ, ग्रामसेवक सागर सव्वाशे यांनी पंचनामे सुरू केले आहे.
विद्युत पुरवठा बंद केल्याने पुढील धोका टळला होता. निरवांगीचे ग्रामसेवक बोराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. सध्या पंचनाम्याचे काम सुरू असून त्यांना मदतीसाठी सानुग्रह अनुदान देण्यासाठी पंचनामे केले जात आहेत.
कुटुंबातील सदस्यांना वाचविले
निमसाखर येथील बीकेबीएनलगत आणि शेळगाव व खोकड ओढा या दोन ओढ्यामध्ये उंचवट्यावर अविनाश मोरे यांचे निवासस्थान आहे. हे दोन्ही ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने मध्यरात्री पाण्याने घराला वेढा टाकला. ही माहिती प्रशासनाला कळविली. मात्र, गुरुवार दुपारी बोटीतून मोरे कुंटुबातील सदस्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.
बोटीतून एकजण सुखरूप बाहेर
निमसाखर येथील शेळगाव ओढ्यात रिक्षा वाहून गेली. यात चालक वाचला आहे. निरवांगी येथील नंदुबाच्या ओढ्यात रात्री 2 जण अडकल्याची माहिती स्थानिकांनी देत एकाला बाहेर काढण्यात यश आले. दुसरा एकजण झुडपाला धरून बसला. तहसीलदाराच्या उपस्थितीत रात्री एक वाजता बोटीतून जेष्ठास बाहेर काढण्यात यश आले.