बारामती -गेल्या दोन दिवसांपासून विजेच्या कडकडाटांसह व वादळी वाऱ्यासह आलेल्या परतीच्या पावसाचा महावितरण यंत्रणेलाही जोराचा तडाखा बसलेला आहे. भीमा, नीरा, कऱ्हा, घोड आदी प्रमुख नद्यांसह सर्व नदीनाले, ओढ्यांना महापूर आल्याने पुणे जिल्ह्यातील वीज यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. बारामती मंडलातील 6 वीज उपकेंद्रातील यंत्रणा ठप्प झाली आहे. विजेचे खांब पुराच्या पाण्यात अक्षरश: वाहून गेले आहेत. अशा परिस्थितीतही पाण्याचा जोर ओसरताच वीज यंत्रणा पूर्ववत करण्यात कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
बारामतीमधील सणसर, शिरसोडी, पाहुणेवाडी, सांगवी, आगोती व कामथडी ही सहा उपकेंद्रे सुरुवातीला पावसामुळे बंद पडली होती. परंतु दिवसभरात पाणी ओसरताच सुरक्षेची खातरजमा करुन ती सुरु करण्यात यश आले. जिल्ह्यात दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे फटका बसला आहे. पुराची झळ 36 गावांना बसली. यामध्ये शेतीचे 27 हजार व शेतीवगळता 8260 ग्राहकांचा समावेश होता. अद्याप बारामती शहर व तालुका तसेच इंदापूर तालुक्यातही पावसाने कहर केलेला आहे. बारामती शहरातील खंडोबानगर, सिद्धेश्वर गल्ली, कसबा (काही भाग) पुरामुळे बंद आहे.
मनुष्यबळ व साहित्यांची जमवाजमव
मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांनी बारामती व इंदापूर तालुक्यातील अनेक बाधित उपकेंद्रांना भेटी देत वीज यंत्रणेची सद्यस्थिती जाणून घेतली. सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने वीजपुरवठा खंडित करणे, तसेच पूर ओसरताच सुरक्षेचे उपाय योजून तो तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जमीनदोस्त झालेली यंत्रणा उभी करण्यासाठी परिमंडल पातळीवरुन सर्व साहित्याची व मनुष्यबळाची जमवाजमव सुरु झाली आहे. उद्या आवश्यक ठिकाणी लागणारे मनुष्यबळ व साहित्य पोहोचविण्यासाठी पथके तयार करण्यात येत असल्याचेही श्री. पावडे यांनी सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व कार्यकारी अभियंता गणेश लटपटे आदी उपस्थित होते.
मोबाइल सेवा विस्कळीत
व्होडाफोन व आयडीयासह या प्रमुख कंपन्यांची मोबाइल सेवा बुधवारी रात्रीपासूनच विस्कळीत झाल्याने आपत्कालीन काळात एकमेकांशी संपर्क साधणे सुद्धा कठीण झाले होते. कॉलसह इंटरनेटही बंद पडल्याने माहितीची देवाण-घेवाण गुरुवारी सायंकाळपर्यंत ठप्पच होती.