पुणे- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालात फेरफार व आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. याप्रकरणी चौकशी समितीने परीक्षा परिषदेत तळ ठोकून कसून चौकशी करत सविस्तर माहितीची जमावाजमव केली.
“टीईटी’ अनियमिता प्रकरणी जी.ए.सॉफ्टवेअर कंत्राटी कंपनीचा व शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली सहा अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे. यात परीक्षा परिषदेचे अध्यक्ष सदस्य सचिव आहेत. शिक्षण आयुक्त, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक, माहिती व तंत्रज्ञान संचालक आदींचा समावेश आहे. या समितीला प्राथमिक अहवाल सादर करण्यासाठी सात दिवस व सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे.
हिवाळी अधिवेशनात “टीईटी’ घोटाळ्याबाबत वादळी चर्चा करत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान, चौकशी समितीचा ताफा शुक्रवारी थेट परीक्षा परिषदेत दाखल झाला होता. या चौकशी समितीने तीन-चार तळ ठोकून परीक्षेबाबतची सर्व माहिती जाणून घेतली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडूनही विचारपूस करुन, कागदपत्रे पाहून वस्तुस्थिती जाणून घेतली. आता या समिती मार्फत अहवाल तयार करुन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सादर करण्यासाठीच्या हालचालींना वेग येणार असल्याचे बोलले जात आहे.