पुणे -करोनामुळे पुकारलेल्या संचारबंदीचा फटका ऐन उन्हाळ्यात लिंबाच्या मागणीवर झाला आहे. खानावळी, उपहारगृह, सरबत विक्री, उसाचा रस विक्री करणारी गुऱ्हाळे बंद असल्याने लिंबाला कमी मागणी आहे. त्यामुळे कमी भाव मिळत आहे. मार्केट यार्डातील फळ विभागातील घाऊक बाजारात दर्जानुसार गोणीस 600 ते 700 रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले, गेल्या वर्षी उन्हाळ्यात बाजार पूर्ण बंद होता. यावर्षीही पूर्णपणे लॉकडाऊन लागेल, या भीतीने शेतकरी जास्त प्रमाणात लिंबू बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. आकाराने लहान, हिरव्या रंगाच्या अपरिपक्व लिंबाची बाजारात आवक होत आहे. नेहमीच्या तुलनेत दुप्पट म्हणजे दररोज दोन ते अडीच हजार गोणी लिंबाची आवक होत आहे.
मंगळवारी तीन ते साडेतीन हजार गोणी आवक झाली. सोलापूर जिल्हा आणि राशिन भागातून लिंबाची आवक होत आहे. ही आवक जास्त आणि मागणी नसल्याने भाव कमी मिळत आहे. विक्री न झाल्याने माल गाळ्यावर शिल्लक राहत आहे. त्यातच करोनामुळे गाळा एक दिवसाआड सुरू असतो.