वेल्हे -गेल्या अनेक दशकांपासून वेल्ह्यातील मढे घाट फोडून महाडला जोडणारा रस्ता होण्याची मागणी वेल्हेकरांची होती. त्या मागणीला यश आले असून, वेल्हेकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. वेल्हे-महाड रस्त्याकरिता 4 कोटी मंजूर झाले असून अनेक वर्षे रेंगाळलेल्या प्रश्नाला हिरवा कंदील मिळाला आहे.
पुण्यातून कोकणात जाण्यासाठी सगळ्यात जवळचा मार्ग असणारा पुणे-नसरापूर-वेल्हे मढेघाट मार्गावरील रस्त्याच्या प्राथमिक स्तरावरील मजबुतीकरणासाठी सुमारे 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद केल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे.
मढेघाट हा अतिशय प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व असलेला व नैसर्गिक विविधतेने नटलेला असून मोठे धबधबे या घाटात आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येत असतात. मात्र, वनखात्याच्या जागेच्या अडथळ्यामुळे हा रस्ता करणे शक्य होऊ शकला नव्हते; परंतु आता केंद्र सरकारमार्फतच या मार्गाला मंजुरी मिळाली असून, निधीची तरतूद करण्यात आल्याने पुणे-नसरापूर वेल्हा कर्णवडीमार्गे महाडला जोडणारा बहुप्रतीक्षित असणारा राज्यमार्ग प्रत्यक्षात येणार आहे.
ताम्हिणी-वरंधापेक्षाही सोयीस्कर रस्ता
पुण्याहून महाडला जाणारा ताम्हिणी घाट आणि भोरमार्गे वरंधा घाटापेक्षा हा मार्ग अतिशय सोयीस्कर असणार आहे. या नवीन मार्गाचे अंतरही कमी असणार आहे. वेल्ह्याच्या शेवटच्या कर्णवडी गावापासून महाड रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे अंतर जेमतेम 10 ते 12 कि. मी. असेल. वरंधा व ताम्हिणी घाट मार्ग अंतर 25 कि. मी. ने कमी होणार आहे. वरंधा घाटमार्गे महाडचे अंतर 130 कि. मी. आहे. वेल्हेमार्गे हे अंतर 106 कि. मी. चे असेल, तर ताम्हणीपेक्षा हे अंतर 17 कि. मी.ने कमी होणार आहे.
पर्यटनाला चालना मिळेल
हा रस्ता झाल्यावर अनेक समस्या दूर होतील. पर्यटनाला चालना मिळेल. दळणवळणाचा प्रश्न सुटेल. छोटे मोठे व्यवसाय उभे राहतील. प्रसंगी बेरोजगारीचा प्रश्न काहीसा सुटेल. कोकण-मुंबईचा प्रवास सुलभ होईल. नोकरीसाठी जवळचे पर्याय उपलब्ध होतील. वेल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले तोरणापासून रायगड किल्ल्याजवळ येईल. तालुक्याचा दुर्गम व मागासलेपणा दूर होण्यास मदत होईल.
========