पुणे – यवत आणि कुरकुंभ भागातील बॅंकेचे एटीएम गॅसकटरच्या सहाय्याने फोडून एकूण 23 लाख 80 हजार 700 रुपये चोरून नेणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. याप्रकरणात तीघांना अटक करून 10 लाख रुपयांची रोख रक्कम, दुचाकी आणि एटीएम मशीन फोडण्यासाठी वापरलेले साहित्य आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अजय रमेशराव शेंडे (वय 32, रा. सहजपूर, ता. दौंड), शिवाजी उत्तम गरड (वय 25, रा. करंजी, ता. रिसोड, जि. वाशिम) आणि ऋषिकेश काकसाहेब किरतिके (वय 22, रा. देवधानुरा, ता. कळंब, जि उस्मानाबाद) या तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते.
कुरकुंभ येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया (दि.16) आणि यवत येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे (दि.17) एटीएम फोडल्याच्या गुन्ह्याचा तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चार पथके स्थापन करण्यात आली होती. अटक आरोपींनी लातूर जिल्ह्यातील गातेगाव पोलीस ठाणे हद्दीत एटीएम यंत्र फोडणे आणि वाशीम येथील घरफोडी असे चार गुन्हेही केल्याचे उघडकीस आले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक संदीप येळे, उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, कर्मचारी तुषार पंदारे, राजु भोमीन, अजित भुजबळ, आसिफ शेख, अजय घुले, प्रमाद नवले यासह यवत पोलीस ठाण्याचे संजय नागरगोजे, गुरू गायकवाड, निलेश कदम, मारूती बाराथे, रामदास जगताप, महेंद्र चांदणे आदीच्या पथकांनी ही कामगिरी केली.
युट्यूबवरून घेतली एटीएम फोडण्याची माहिती…
आरोपी शेंडे हा मूळचा सहजपूर येथील असून मजुर पुरविणारा ठेकेदार म्हणून काम करतो. इतर आरोपी हे मुळचे वाशिम, लातूर, बुलडाणा येथील असून ते मजुरीचे काम करतात. त्यामुळे तीघांची ओळख झाली. शेंडे हा केवळ बारावी उत्तीर्ण आहे. मात्र, त्याने युटयूब वरून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याची माहिती घेतली तसेच त्यासाठी लागणारे साहित्य ऑनलाइन माध्यमातून मागवून घेतले. त्यानंतर ग्रामीण भागात रेकी केली आणि एटीएम यंत्र फोडले आणि रक्कम चोरली. तसेच गुन्ह्यांत वापरलेली दुचाकी उरूळीकांचन येथून चोरल्याची माहिती उघडकीस आली आहे.
जिल्ह्यात केवळ 10 टक्के एटीएमवर सुरक्षारक्षक तैनात…
पुणे ग्रामीण भागात 800 पेक्षा जास्त एटीएम यंत्र आहेत.त्यामध्ये केवळ 10 टक्के एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. बॅंकामध्ये तसेच एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षक नेमणे कमी केले आहे. दरम्यान, सुरक्षारक्षक असावेत यासाठी जिल्ह्यांतील बॅंक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती अभिनव देशमुख यांनी दिली.