पुणे (सागर येवले) –करोना… हा तीन अक्षरी शब्द ऐकला तरी मनात धस्स होतं… आज दोन वर्षांनंतरही ही धडधड अशीच होते… तो ऍम्ब्युलन्सचा आवाज… हॉस्पिटलमध्ये अनुभवलेले बहिष्कृत एकारलेपण… आजही आठवलं तरी नको वाटतं… या विषयावर बोलायला अन् आठवायलाही… ही व्यथा आहे पुण्यात पहिल्यांदा करोना संसर्ग झालेल्या दाम्पत्याची. ती त्यांनी “प्रभात’कडे व्यक्त केली.
“9 मार्च 2020”… राज्यात करोनाचा पहिला बाधित सापडल्याची नोंद पुण्यात झाली. दुबईहून परतलेल्या दाम्पत्याचा करोना चाचणी अहवाल “पॉझिटिव्ह’ आला… अन् बाधितांचा “काऊंटडाऊन’ सुरू झाला. मात्र, या दाम्पत्याला वेळीच विलगीकरणात ठेवल्याने मार्च महिन्यात बाधित संख्या आटोक्यात होती. मात्र, अन्य राज्यांसह बाहेर देशातून आलेल्या व्यक्तींकडून तपासणी वेळेत न केल्यामुळे आजाराचा प्रसार झाला. त्यातून पुण्यात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली.
हे दाम्पत्य केवळ निमित्त…
आमच्या विवाहाचा 25 वा वाढदिवस होता. त्यानिमित्त तो साजरा करण्यासाठी दुबईला आम्ही दोघेच जाणार होतो. नंतर मुलीला सुट्टी मिळाल्याने तिलाही घेऊन गेलो. आम्ही 2 मार्च 2020ला दुबईहून मुंबईला पहाटे आलो. त्यावेळी कसलाही त्रास नव्हता. घरी परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मिस्टरांना ताप आणि थंडी वाजायला लागली. रविवार असल्यामुळे आम्ही घरीच उपचार घेतले. तापावर डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी टेस्ट केल्या, रिपोर्ट नॉर्मल होते. मात्र, ताप उतरत नसल्याने त्यांनी करोनाची चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला. आम्ही नायडू हॉस्पिटलला 7 मार्चला गेलो होतो. तब्येत व्यवस्थित होती.
जर त्रास होत नाही, तर टेस्ट कशाला करता असे म्हणत तेथील डॉक्टरांनी चाचणी करण्याविषयी अनास्था दाखवली. चाचणी करायची झाली तर रुग्णालयात दाखल व्हावे लागेल, असे सांगितले. त्यामुळे आम्ही घरी परत आलो. पण जर आपल्याला संसर्ग झाला असेल तर… इतरांनाही होऊ शकतो, असा विचार करून अखेर 9 मार्चला सकाळी चाचणी केली. संध्याकाळी रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचा फोन आला. ते ऐकताच खचूनच गेलो. खरे तर घाबरण्यासारखी लक्षणे नव्हती. डॉक्टरांनीही धीर दिला. अखेर नायडूत दाखल झालो. कुटुंबीयांच्याही चाचण्या करण्यात आल्या मात्र अन्य सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. दहा दिवसांनंतर आमचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि आम्ही आल्या पावली घरी परतलो. सुरुवातीला जवळचे फोन करायलाही एक नर्स यायची. तीच औषध द्यायची आमच्या प्रत्येक हालचाली टिपून घ्यायची. बाकीचे डॉक्टर वगैरेंसाठी आम्ही म्हणजे दुरून डोंगर साजरे, ती परिचारिका… परिचारिका कसं म्हणू ती तर शुभ्रदेवताच… अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
घाबरत होते. पण हळूहळू फोन येऊ लागले. गंमतीचा भाग म्हणजे त्यानंतर पॉझिटिव्ह आलेले हा त्रास होता का? तुम्ही बरे कसे झालात हे विचारायला फोन करत असत. पण त्या दिवसांचा काळ खरोखरंच कसोटी पाहणारा होता. डॉक्टरही जवळ फिरकत नसत. मी लांबूनच बोलत. सूचना करत. आपण कोणीतरी बहिष्कृत आहोत ही भावना बाळगतच आम्ही एकारलेपणाचे दहा दिवस काढले. म्हणूनच त्या आठवणीही नको वाटतात, असं त्यांनी सांगितलं.