पुणे – कुत्रे, साप चावण्याचा प्रकार हा सर्वसामान्यपणे माहित आहे. परंतु घरात फिरणारा मांजर हा प्राणी चावेल असा प्रकार खूप कमी वेळा होतो. परंतु गेल्या वर्षभरात मांजरांनी चावा घेतल्याचे एकट्या पुण्यात १,५५६ प्रकार घडले आहेत. माकडांनी माणसांना चावल्याचे ८२ प्रकार वर्षभरात घडले आहेत. सरकारी रुग्णालयात देण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक लसींवरून ही आकडेवारी पुढे आली आहे.
राज्यात सर्व जिल्ह्यांत मिळून गतवर्षी तब्बल पाच हजार ४४३ जणांना माकडाने चाव घेतल्याची नाेंद आराेग्य विभागाकडे झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक चावे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात झाले. तेथे गेल्या वर्षी ७१० जणांना माकडांनी नागरिकांना चावा घेतला आहे. याच कालावधीत राज्यात ६० हजार ५४३ मांजरांनी माणसांना चावा घेतल्याची माहिती समाेर आली आहे.
माकडांच्या सर्वाधिक चाव्यांची (७१०) नाेंद मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात झाली. त्यापाठाेपाठ अमरावती (५७६), उस्मानाबाद (५०६), मुंबई (३८२) आणि पाचव्या क्रमांकावर सातारा (२६२) आहे. यवतमाळमध्ये सर्वांत कमी १२ चावे नाेंदवले गेले. याशिवाय मांजरांचे सर्वाधिक चाव्यांचे प्रकार मुंबईत घडले असून, राज्यात गेल्यावर्षी घडलेल्या ६० हजार ५४३ प्रकारातील १२ हजार ७३२ चाव्याची प्रकरणे एकट्या मुंबईत घडली आहेत. त्यानंतर काेल्हापूर (नऊ हजार ०४५), ठाणे (सहा हजार ४११), रायगड (तीन हजार ०९८) आणि पाचव्या क्रमांकावर पालघर (दोन हजार २२०) आहे.
“एखाद्या प्राण्याने चावा घेतल्यास तत्काळ रुग्णालयात जाऊन प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे. चावा घेतल्यानंतर प्रथमोपचार म्हणून जखम पंधरा मिनिटे पाण्याखाली धरून धुवून घ्यावी. जखम किती खोल आहे, त्याप्रमाणे दवाखन्यात उपचार केले जातात. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डोस घेणे आवश्यक आहे.” – डाॅ. दीपक साळुंखे, राज्य साथरोग अधिकारी, पुणे.