तीन विद्युत दाहिन्यांची उभारणी लांबणीवर
पुणे – करोनाग्रस्तांवर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यात येथील विद्युत दाहिन्याही कमी पडत असल्याने आणखी तीन चिमण्या बसवण्यात येणार होत्या. मात्र, आधी येथील धुराची समस्या दूर करावी. तसेच या दाहिन्या बसवू नयेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. हा विरोध लक्षात घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण केल्यानंतरच नवीन दाहिन्या बसवण्यात येणार आहेत, असे पालिकेचे विद्युत विभागप्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी स्पष्ट केले.
वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील फाटकबाग, आनंदबाग, निस्सान हट, अनूपम सोसायटी, सुधांशू सोसायटी, दी सत्संग को-ऑप. सोसायटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.
महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, नगरसेविका सरस्वती शेंडगे, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा स्मिता वस्ते, रघुनाथ गौडा, शैलेश लडकत आदी यावेळी उपस्थित होते. नगरसेवक धीरज घाटे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीमुळे होणारा धूर आणि काजळीबाबत स्थानिकांनी चिंता व्यक्त केली. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या. त्याच वेळी वैकुंठातील लाकडावरील पारंपारिक दहनाऐवजी विद्युत दाहिन्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
त्यासाठी तीन नवीन चिमण्या बसविण्यात येणार आहेत. मात्र, आधी धुराची समस्या सोडवावी त्यानंतरच नवीन दाहिन्या उभाराव्यात, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. त्यावर महापालिकेनेही एक पाऊल मागे घेत तूर्तास या दाहिन्या बसविण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.