वडगावशेरी -साथ जन्माची आणि मरणाचीही… लग्नात अग्नीला फेऱ्या घेताना अशी शपथ घेतलेल्या पती-पत्नीने आपले हे वचन खरे करून दाखविले. लग्नाची 32 वर्षे सुखी संसार करणाऱ्या करोना आजाराने बाधित पती-पत्नीने चार दिवसांच्या अंतराने या जगाचा निरोप घेतला.
हवेली तालुक्यातील केसनंद गावातील प्रकाश गायकवाड (वय 61) आणि अलका गायकवाड (वय 58) अशी या दाम्पत्याची नावे आहेत. गावातील प्रसिद्ध अमर मंडळाची स्थापना करण्यात प्रकाश यांचा मोलाचा सहभाग होता.
या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी भरीव समाजकार्य केले, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पत्नी अलका यांनीही ग्रामपंचायत सदस्य पदाच्या कालावधीत गावाची आणि समाजाचीही सेवा केली होती. प्रकाश हे दोन वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाले होते.
त्यानंतर त्यांनी पत्नीसह स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले होते. दुर्दैवाने या दोघांनाही 15 दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाला होता. त्यावर उपचार सुरू असतानाच प्रकाश यांचे दि. 14 मे रोजी निधन झाले. पतीचे निधन झाल्याचे समजल्यानंतर अलका यांनीही दि. 18 मे रोजी जगाचा निरोप घेतला.