राहू -दौंड तालुक्यात अंडी, चिकनला चांगला दर मिळत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत. गेल्या वर्षी अंडी, चिकनविषयी गैरसमज निर्माण झाल्याने पोल्ट्री चालकांना चांगलाच फटका बसला होता.
यावेळी दुसऱ्या लाटेत दर वधारल्याने नुकसान भरून येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी आगाऊ रक्कम देऊन खरेदी केली जात आहे.
गेल्या वर्षभरापासून करोळाकाळ सुरू झाला आहे. सर्वत्र अर्थकारण बिघडून गेले आहे. इम्युनिटी पॉवर वाढवा व मांसाहार करा, असा सल्ला डॉक्टर बाधितांना आणि त्यांच्या नातेवाईकांना देऊ लागले आहेत.
त्यामुळे बाजारपेठेत अंडी, चिकनला बाजारभाव मिळू लागला आहे. अनेक शाकाहारी व्यक्तींनी आरोग्याच्या सदृढतेसाठी मांसाहार करण्यास सुरवात केली आहे. त्याचा चांगला परिणाम ग्रामीण अर्थकारणावर झाला आहे. चिकन, मटण व अंड्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
मागीलवर्षी लॉकडाऊनचा फटका केवळ सोशल मीडियामुळे बसला होता. एका चुकीच्या मेसेजमुळे व्यावसायिक एकदम अडचणीत आले होते. त्यामुळे 30 रूपये किलोने देखील चिकन कोणी विकत घेईना. अशी बिकट अवस्था झाली होती.
यानंतर चिकनचे भाव वाढले. त्यामुळे मालाचा तुटवडा निर्माण होऊन चिकन काही ठिकाणी 240 रुपये किलो दराने विकले जात आहे.