पुणे – साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. या मागण्यांबाबतचा सविस्तर अहवाल साखर आयुक्त हे राज्य सरकारला सादर करणार आहेत, अशी माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली.
साखर आयुक्तालयात साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि ऊस दर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची संयुक्त बैठक नुकतीच झाली. या बैठकीत शेतकरी संघटनांच्या वतीने रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अॅड. योगेश पांडे सहभागी झाले होते.
मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळात कारखान्यांवर हवाई अंतराची कोणतीही अट नको आहे. सर्वच कारखान्यांनी आपल्या गाळप क्षमतेत वाढ केली आहे, त्यामुळे उसाच्या उपलब्धतेचा प्रश्न येत नाही. २५ किलोमीटरच्या हवाई अंतराच्या नियमामुळे काही राजकीय नेत्यांची साखर उद्योगात मक्तेदारी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळण्यासाठी साखर उद्योगात खुली स्पर्धा निर्माण होण्याची गरज आहे. त्यामुळे हवाई अंतराची अट रद्द करावी, अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात आली.