पुणे -करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन न केल्यामुळे संसर्ग अधिक वाढू शकतो. त्यामुळे विनामास्क बाहेर पडू नये, हात स्वच्छ धुवावे आणि स्वच्छता या त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मात्र, त्यातही काही बेजबाबदार व्यक्ती विनामास्क बाहेर फिरताना आणि रस्त्यावर थुंकतात, अशा 2 लाख 70 हजार 117 व्यक्तींवर ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाई करून तब्बल 9 कोटी 20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या आठवड्यात विनामास्क फिरणाऱ्या 1 हजार 11 जणांवर कारवाई करून 23 लाख 37 हजारांचा दंड वसूल केला आहे. ग्रामीणमध्ये एकूण दंडात्मक कारवाईमध्ये पोलीस प्रशासनाकडून सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे.
1 लाख 23 हजार 666 व्यक्तींवर कारवाई करून 4 कोटी 24 लाख 99 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगरपरिषद विभागाने 83 हजार 226 विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करून 2 कोटी 93 लाख 79 हजार 135 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर ग्रामपंचायत मार्फत 63 हजार 225 जणांवर कारवाई करून 2 कोटी 1 लाख 51 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
विनामास्क फिरणे, रस्त्यावर थुंकणे, अशांवर ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यानुसार प्रत्येक आठवड्याला या कारवाईबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. त्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात तब्बल 30 हजार 565 व्यक्तींवर कारवाई करून 1 कोटी 34 लाख 37 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मात्र, मागील आठवड्यापासून त्यामध्ये हळूहळू घट होत असल्याचे दिसून येते. मात्र, ही कमी झालेली संख्या म्हणजे नागरिक करोनाचे नियम पाळत आहेत की, कारवाई थंडावली. असा प्रश्न उपस्थित होतो.
बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामीण भागातील निर्बंध अजूनही कायम आहेत. त्याचा फटका व्यावसायिकांसह नागरिकांना बसत आहे. बाधित दर 5 टक्क्यांखाली आला तरच निर्बंधामध्ये शिथिलता मिळू शकते.