कोलकाता – ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला दोन सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या हॉकी संघातील दिग्गज हॉकीपटू केशव दत्त यांचे बुधवारी सकाळी पश्चिम बंगाल येथील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
दत्त यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. ममता यांनी ट्विटमध्ये म्हटले की, हॉकी जगताने एका महान खेळाडूला गमावले आहे. केशव दत्त यांच्या निधनाने मी दुःखी आहे.
ते 1948 आणि 1952 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकवणाऱ्या संघात होते. भारत आणि बंगालचे चॅम्पियन होते. त्यांचे कुटुंब आणि मित्र यांच्याबद्दल सहानुभूती.
केशव दत्त यांचा जन्म 29 डिसेंबर 1925 रोजी लाहोरमध्ये झाला होता. फाळणीनंतर ते कोलकाता येथे स्थायिक झाले. हॉकीमधील भारताच्या सुवर्ण काळातील ते एक महत्त्वाचे साक्षीदार होते.
ऑलिम्पिक विजेत्या भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू असणारे दत्त हे 1951-1953 आणि नंतर 1957-1958 मध्ये मोहन बागान या क्लबकडूनही खेळले होते.
त्यांच्या उपस्थितीतच मोहन बागान संघाने 10 वर्षे हॉकी लीगमध्ये विजय मिळवला होता. 2019 मध्ये दत्त यांना मोहन बागान रत्न ही देण्यात आला होता.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोमबम म्हणाले, आज दिग्गज हॉकीपटू केशव दत्त यांच्या निधनाने आम्ही सर्वजण दु:खी झालो आहोत.
ते 1948 आणि 1952 ऑलिम्पिकमध्ये भारताल सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या संघातील एकमेव जीवित खेळाडू होते. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे.