अहमदनगर – देशात करोना संसर्गाने रौद्ररुप धारण केल्यानंतर केंद्र सरकारने करोना लसीकरणावर भर देण्यास सुरुवात केली होती. मात्र देशात केवळ दोनच कंपन्या करोना लसीची निर्मिती करत असल्यामुळे सहाजिकच लसीचा तुटवडा निर्माण झाला. या मुद्दावरून राजकारण तापलं होतं. त्यातच करोना लस निर्मितीत आघाडीवर असलेल्या सिरमचे प्रमुख आदर पूनावाला यांनी देश सोडून इंग्लंड गाठलं. त्यावेळी त्यांनी आपल्याला धमक्या मिळत असल्याचं म्हटलं होतं. यावरून आता राष्ट्रवादीच्या नेत्यांने केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
करोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम संस्थेचे आदर पुनावाला यांनी धमकी दिल्याचा खुलासा केला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा आरोप केला आहे. सिरम संस्थेला केंद्र सरकारनेच धमकी दिली होती. त्यामुळे जून महिन्यात 10 कोटी डोस मिळू शकलेले नाहीत, असा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. ते अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
मुश्रीफ यांनी देशातील लसीकरणाच्या मुद्दावरून केंद्रातील मोदी सरकारवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, सिरम संस्था जूनमध्ये राज्य सरकारला १० कोटी लस देणार होती. मात्र केंद्र सरकारने सिरमला धमकी दिल्यामुळे त्या लसी महाराष्ट्राला मिळाल्या नाही. दुसरीकडे आदर पुनावाला यांना दिलेल्या धमकीचे प्रकरण सध्या हायकोर्टात आहे.