पुणे – गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा बाजार बंद असल्यामुळे माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील नोंदीत माथाडी कामगारांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन कामगार व उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना देण्यात आल्याची माहिती कामगार युनियनचे सचिव संतोष नागरे यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बांधकाम मजूर कामगारांना दोन हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याच अनुषंगाने सरकारने नोंदीत माथाडी कामगारांना सरकारच्यावतीने अथवा माथाडी मंडळाच्या प्रशासकीय खर्च, नुकसान भरपाई किंवा कल्याण निधी यांसारख्या फंडातून मंडळाच्या नोंदणीकृत कामगारांना महिन्याला पाच हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा करावेत.
जेणेकरून कामगारांची उपासमार होणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बांधकाम मजुरांना 2 हजार रुपये देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे, तशीच माथाडी कामगारांना ही मदत त्यावी असे नांगरे यांनी म्हटले आहे.