रांजणगाव गणपती -शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवडी सुरू झाल्या आहेत. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापर्यंत कांदा लागवडी सुरू राहण्याची शक्यता आहे. या भागात कांदा लागवडी कोरड्यात केल्या जात नसल्याने दिवसा पाणी देऊन लागवडी केल्या जातात.
परंतु , महावितरणकडून एक आठवडा दिवस पाळी व दुसऱ्या आठवड्यात रात्र पाळीत वीजपुरवठा केला जात आहे. याचा परिणाम थेट कांदा लागवडीवर होत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापर्यंत दिवस पाळीत वीजपुरवठा करण्याची मागणी दहिवडी (ता. शिरूर) येथील शेतकरी शरद इंगळे यांनी निवेदनाद्वारे केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांच्याकडे केली आहे.
एक आठवडाभर दिवसपाळीत वीजपुरवठा होत असल्याने त्याच आठवड्यात सर्व शेतकरी कांदा लागवड करण्याचे नियोजन करतात, परिणामी मजूर टंचाईचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. जास्तीचे पैसे देऊन दुसऱ्या भागातून मजूर आणावे लागत आहेत. त्यात गाडी भाडे द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
तसेच लागणीस आलेली कांदा रोपे योग्य वेळेत न लावल्यास ती खराब होऊन जात आहेत. आधीच मूळकूज, पीळ पडणे अशा रोग व किडीमुळे रोपे कमी उपलब्ध आहेत. त्यामुळे महावितरण प्रसासनाने दिवस पाळीत वीजपुरवठा केल्यास मजूर टंचाई कमी होण्यास मदत होईल तसेच शेतकऱ्यांना अधिकचा पडणारा भुर्दंड कमी होण्यास मदत होईल. अशी मागणी नागरिक करीत आहेत.