सातारा – कोयना जलविद्युत टप्पा क्रमांक एक व दोनच्या आपत्कालीन झडप भुयार येथील 62 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या उल्लोळ विहिरीच्या अस्तरीकरणाला तडे गेले आहेत. या गळतीचे अन्वेषण करण्यात आले असूनही गळती बंद करण्याच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कोयना जलविद्युत विभागाच्या सूत्रांनी दिली.
याबाबतची अधिक माहिती अशी की कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी विद्युत निर्मितीकरिता जे पाणी नवजा टॉवरमधून अधिजल भुयार किंवा हेड्रेस टनेल मार्गे निघते, त्या बोगद्याच्या शेवटी एक उल्लोळ विहीर किंवा सर्ज वेल बांधली आहे. येथपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जाते. ही सर्ज वेल 1960 मध्ये बांधून पूर्ण झाली. ती कातळामध्ये 100 मीटर खोल खोदली आहे. त्याला अर्धा मीटर रुंदीचे कॉंक्रिट अस्तरीकरण करण्यात आले आहे.
ही विहीर गेली साठ वर्षे तिथे असून अनेक भूकंपाचे धक्के या विहिरीने पचवले आहेत. मात्र, काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे या विहिरीमधून झिरपलेले पाणी इमर्जन्सी वॉल टनेल किंवा आपत्कालीन झडपेद्वारे भुयारामध्ये जाते आणि तिथून ते वाहन डोंगराच्या उतारावरून बाहेर पडते. यामुळे वीजगृहाला, जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नाही. दुरुस्तीसाठी वीज निर्मिती बंद ठेवावी लागेल. सद्यस्थितीमध्ये गळतीचे अन्वेषण झाले असून ही गळती बंद करण्याची उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याप्रमाणे टेंडर प्रक्रियासुद्धा प्रगतीपथावर आहे.