नवी दिल्ली – प्राचीन भारतीय भाषांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे जतन करणे ही काळाची गरज आहे. या प्राचीन भाषांमुळे आपल्याला प्राचीन मूल्य आणि ज्ञान याची माहिती मिळते, असे उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत आज शास्त्रीय भाषांमधील सुमारे 100 प्रतिभावंतांना “राष्ट्रपती सन्मान पत्र’ आणि “महर्षी बादरायण व्यास सन्मान’ पुरस्कार दिल्यानंतर बोलत होते. जेव्हा एक भाषा मरते तेव्हा संपूर्ण संस्कृती मरण पावते, आपल्याला तसे होऊ द्यायचे नाही. भाषांसह आपल्या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करणे हे आपले घटनात्मक कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. सुमारे 600 भाषा अस्ताला जाण्याच्या मार्गावर असून, गेल्या 60 वर्षात 250 भाषा अस्तंगत पावल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. त्याबाबत बोलतांना उपराष्ट्रपती म्हणाले की, आधुनिक भाषांची मूळे ही शास्त्रीय भाषांमध्ये खोल रुतलेली आहेत.
आपल्या मातृभाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय चळवळ सुरु करण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि शाळा प्रशासनांना मातृभाषेत प्राथमिक आणि उच्च शिक्षण देण्याची सूचना त्यांनी केली.
या कार्यक्रमात सुमारे 100 साहित्यिक आणि भाषातज्ज्ञांना त्यांनी संस्कृत, अरेबिक, रशियन, पाली, प्राकृत, शास्त्रीय कन्नड, शास्त्रीय तेलगू आणि शास्त्रीय मल्याळम भाषांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.