पुणे – खडकवासला धरण ते फुरसुंगी या 28 किलोमीटर बोगद्यातून पाणी नेण्याचा प्रकल्प जलसंपदा विभागाने हाती घेतला आहे. यासाठी दीड हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यासाठी एशियन बॅंकेकडून कर्जाच्या माध्यमातून अथवा मोकळ्या जागा अटी-शर्तींवर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना हस्तांतरित करून टीडीआरच्या माध्यमातून निधी उभारणे असे दोन पर्याय पुढे आले आहेत.
जलसंपदा विभागाने या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. याला मुख्य अभियंता आणि त्यांनतर राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या योजनेमुळे सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उभारण्यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली. यामध्ये निधी उभारण्याच्या पर्यायांवर चर्चा करण्यात आली.
या प्रकल्पासाठी एशियन बॅंकेने कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. येत्या काही दिवसांत या प्रकल्पाची पाहणी बॅंकेच्या पथकाकडून करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तो पूर्ण होण्यास किमान तीन वर्षे लागणार आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध जागेचा उपयोग व्यावसायिक कारणांसाठी करता येणे शक्य आहे. सध्या ही जागा 500 मीटर ते एक किलोमीटर या रुंदीची आहे. त्यातील काही भाग महापालिका व पीएमआरडीए हद्दीत येतो. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जागा कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित करता येईल? त्यातून निधी उभारता येईल का, यांची चाचपणी सुरू आहे.
आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य
साधारणत: एक टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यासाठी भूसंपादन आणि प्रत्यक्ष धरण उभारणे यासाठी सुमारे एक हजार कोटींचा खर्च येतो. यानुसार अडीच टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये लागू शकतात. मात्र, बोगद्यातून पाणी नेणे हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
- खडकवासला धरण ते फुरसुंगी बोगद्यातून पाणी नेण्याचा प्रयत्न
- निधी उभारण्यासाठी जलसंपदा विभागाकडून पर्यायांची चाचपणी
नवीन धरणासाठी आता जागाच नाही
कृष्णा पाणी तंटा लवाद प्राधिकरणानुसार पुणे जिल्ह्यात नवे धरण बांधणे शक्य नाही. कारण, आवश्यक पाणी यापूर्वीच अडवून त्यावर धरणे बांधण्यात आली. तसेच नवीन धरण बांधायचे झाल्यास नवीन जागेचा शोध घ्यावा लागेल. याचसह भूसंपादन आणि पुनर्वसन हे काम आता अवघड आहे. या पार्श्वभूमीवर बोगद्याद्वारे पाणी नेण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.