औरंगाबाद – करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असल्यामुळे औरंगाबाद येथील प्रशासनाने शहरांमध्ये 10 ते 18 जुलैदरम्यान लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे औरंगाबाद परिसरातील वाहन कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद परिसरामध्ये बजाज ऑटो आणि स्कोडा या कंपन्यांचे उत्पादन होते. त्याचबरोबर या कंपन्यांना सुटे भाग पुरविणाऱ्या कंपन्यांच्या कामकाजावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. बजाज ऑटोमधील अडीचशेपेक्षा जास्त कामगारांना करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्याचबरोबर काही कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कारखान्यातील कामगार संघटनांनी काम बंद ठेवण्याची मागणी केली होती.
आता पूर्ण शहरातच लॉकडाऊन सुरू करण्यात आले असल्यामुळे स्कोडा आणि बजाज ऑटोचे कामकाज पूर्णक्षमतेने होऊ शकणार नाही. त्यामुळे या कालावधीतील या कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.