प्रियांका गांधी यांचा उत्तरप्रदेश सरकारला टोला
लखनौ – उत्तरप्रदेशातील सत्ताधारी पक्षाने आधी सत्याचा मार्ग अनुसरावा आणि मगच त्यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी बोलावे असा टोला कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी त्या सरकारला लगावला आहे. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती निमीत्त प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली होती त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की गांधीजींनी सत्याचा आग्रह धरला.
त्यानुसार गांधींविषयी जर तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्ही आधी सत्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे असे त्या म्हणाल्या. तत्पुर्वी पत्रकारांशी अनौपचारीकरित्या बोलताना त्या म्हणाल्या की राज्यात महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू आहेत. त्या विषयी जे आवाज उठवू पहात आहेत त्यांचाहीं आवाज दाबून टाकला जात आहे. त्याच्या विरोधात आम्ही निश्चीतपणाने संघर्ष करू असे त्या म्हणाल्या.
महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करणाऱ्या स्वामी चिन्मयानंद याच्या विरोधात शहाजहानपुर येथे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉंग्रेसच्या 80 कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली त्या अनुषंगाने त्यांनी हे विधान केले. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमीत्त उत्तरप्रदेश सरकारने विधीमंडळाचे 36 तासांचे विशेष अधिवेशन आयोजित केले आहे त्यावर कॉंग्रेससह सर्व विरोधकांनी बहिष्कार घातला आहे.