संबळ, (उत्तर प्रदेश) – लोकांशी संबंधित विषयांवर आवाज उठवून प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील लोकांच्या मनात स्वतःच्या नेतृत्वाबाबत विश्वास जागवला असून त्यांच्यामुळे आज उत्तर प्रदेशात कॉंग्रेसची चर्चा सुरू झाली आहे, ही प्रियांकांची मोठी अचिव्हमेंट आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केले आहे.
प्रियांकांनी लखीमपूरची घटना असो की तेथील शेतकरी, मजूर आणि व्यापाऱ्यांचा प्रश्न असो प्रत्येक प्रश्नांत लक्ष घालून तेथे काम सुरू केले आहे. यातूनच त्यांनी उत्तर प्रदेशात एक नवीन टीमही तयार केली आहे.
त्यांच्या कामामुळेच लोकांनी आता उत्तर प्रदेशात पुन्हा कॉंग्रेसचे नाव घ्यायला सुरुवात केली आहे असे निरीक्षणही दिग्विजयसिंह यांनी नोंदवले आहे. ते येथे काल रात्री पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, पूर्वी उत्तर प्रदेशात कोणीही कॉंग्रेसविषयी फारसे बोलण्यास उत्सुक नसे. आता प्रत्येक जण कॉंग्रेसविषयी बोलू लागला आहे, हे प्रियाकांच्याच कार्याचे यश आहे असेही त्यांनी नमूद केले.
चीनच्या अरुणाचल प्रदेशातील घुसखोरीविषयी विचारले असता ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्याच अरुणाचल प्रदेशातील खासदाराने त्या राज्यात चीनने बऱ्याच आतपर्यंत घुसखोरी केल्याचे म्हटले आहे; पण अजूनही पंतप्रधान त्यावर काहीही बोलले नाहीत. मायावती यांचा जन्म होण्याच्याही खूप आधीपासून कॉंग्रेस दलितांच्या कल्याणाचे कार्य करीत होती, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महंमद अली जीना यांचेही मोलाचे योगदान असल्याचे विधान अखिलेश यादव यांनी केले आहे, त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की, म्हणूनच बहुधा लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या पाकिस्तान दौऱ्यावेळी जीनांच्या मझारवर चादर चढवून तेथे दर्शन घेतले असावे.