पुणे – राज्यातील शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामकाजातून वेळ काढून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. याबरोबरच शासन निर्णय, योजनाची सविस्तर माहिती सर्व स्तरापर्यंत सक्षमपणे पोहचवावी.
देशात परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये (पीजीआय) महाराष्ट्राला पहिला क्रमांक मिळालाच पाहिजे यादृष्टीने टार्गेट ठेवून काम करा. केवळ भाषणे ऐकण्यापुरतचे मर्यादित स्वरुप ठेवू नका. सतत देण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचा गांभीर्यापूर्वक विचार करून त्याची अंमलबजावणी करा, अशा शब्दात शालेय शिक्षणत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने विद्या प्राधिकरणात उल्हास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत आयोजित क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा व दोन दिवसीय राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, विद्या प्राधिकरणाचे संचालक अमोल येडगे, सहसचिव इम्तियाज काझी, योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे आदी उपस्थित होते.
नवभारत साक्षरता हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहेत. यातून निरक्षरांना साक्षर करण्यासाठी शिक्षकांमध्ये कर्तव्याची भावना रुजवावीच लागणार आहे. या कार्यक्रमाकडे शासनाचा कार्यक्रम म्हणून न पाहता आपली जबाबदारी म्हणून घा. राज्याची प्रगती डोळ्यापुढे ठेवून हा कार्यक्रम यशस्वीपणे राविण्याची गरज आहे, असे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र शासनाने मागील वर्षाच्या जाहीर केलेल्या “पीजीआय’ इंडेक्समध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावरून सातव्या क्रमांकावर गेला होता.
आपल्याकडे चांगल्या प्रकारची शिक्षणपद्धती असताना ऑनलाईन नोंदीमध्ये कमी पडल्यामुळेच ही घसरण झाली. यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने एकत्रित प्रयत्न करावे लागणार आहे. सर्व शिक्षणपद्धतींचे एकत्रीकरण करून राज्यासाठी अभ्यासक्रम तयार करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
व्यवसाय शिक्षणावर अधिक भर
शिक्षणाकडे उद्याची पिढी घडविण्याचे साधन म्हणून पाहावे. शिक्षण हे पाठांतराचे नव्हे तर समजून घेण्याचे शास्त्र आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटी तयार करत असलेल्या अभ्यासक्रमात जे सर्वोत्कृष्ट आहे ते समाविष्ट करावे. त्यानंतर मात्र त्यात वारंवार बदलाचे प्रयोगही केले जाऊ नयेत. मुलांना श्रमाचे महत्त्व लक्षात यावे यासाठी नवीन धोरणात कृषी शिक्षणाचा, स्काऊट गाईडचा समावेश केला आहे. व्यवसाय शिक्षण, कृषी शिक्षण प्राथमिक स्तरावरूनच सुरू झाले पाहिजे, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.