नवी दिल्ली – देश “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा करत आहे. या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या बुरुजावरून मुख्य सोहळा होत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले आहे. पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत.
पंतप्रधानांनी मार्च 2021 मध्ये, गुजरातमधील साबरमती आश्रमातून “स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी अभियानाची’ सुरुवात केली होती. हा उत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.
या कार्यक्रमात, सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रासह 32 ऑलिंपिक विजेते खेळाडूदेखील सहभागी झाले आहेत. त्याशिवाय, साई- म्हणजेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे दोन अधिकारी यांना आजच्या कार्यक्रमाचे विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच इतर 240 ऑलिम्पिक खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि साईचे अधिकारी यांना लाल किल्ल्यासमोरच्या ज्ञान पथाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित आहेत.
भारतीय खेळांडूनी यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आजवरची सर्वोत्तम, कामगिरी करत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदके पटकावली आहेत. तसेच कोविड-19 विरोधातल्या लढ्यात, ज्यांनी आघाडीवर राहून कर्तव्य बजावणाऱ्या सर्व करोना योद्ध्यांसाठी यावेळी स्वतंत्र आसनव्यवस्था करण्यात आली आहे.
यावर्षी पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिन सोहळ्यात, पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर, या संपूर्ण स्थळावर हवाई दलाच्या एमआय 17 1 व्ही हेलिकॉप्टरने, पुष्पवृष्टी केली गेली. पुष्पवृष्टी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करीत आहेत. राष्ट्राला उद्देशून भाषण संपल्यानंतर राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स राष्ट्रगीत गातील. विविध शाळांमधील एनसीसीचे 500 कॅडेट्स या कार्यक्रमात सहभागी आहेत.