पुणे – “राज्याचा विकास, जनतेचे प्रश्न सोडवणे, आपल्या भागाचा कायापालट करण्यासाठी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. तसेच “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा मजबूत नेता नाही,’ असे विधानही पवार यांनी केले.
साखर संकुल येथील बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी पुण्यात होते. त्यांच्याबरोबर महायुतीबाबत थोडी आणि 80 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प केंद्राच्या निधीतून राज्यात येत आहेत. विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे स्टेशन, रेल्वे मार्ग, मेट्रो याबाबत अधिक चर्चा झाली. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्राधान्याने करायचे आहे. रिंगरोडच्या कामाला गती दिली आहे. पुणे-नाशिक रेल्वेबाबतही शाह हे सकारात्मक आहेत. वीस-बावीस वर्षे होत नसलेले विषय केंद्र सरकार धाडसाने करत आहे,’ असे सांगत पवार यांनी कौतुक केले.
जयंत पाटील-शाह यांची भेट नाही
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अमित शाह यांची भेट झाली नाही. जयंत पाटील हे शरद पवार यांच्याबरोबर होते. त्यामुळे ते भेटलेले नसताना विनाकारण बातम्या दिल्या जातात, असेही पवार म्हणाले.