नवी दिल्ली – देशात करोना विषाणू संकटाने हाहाकार माजवला आहे. नव्या बाधितांचा आकडा रोज एक नकोसा विक्रम प्रस्थापित करत असून रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, रेमडीसीवीरसाठी भटकावं लागतंय. देशासमोर करोनाचे संकट उभे ठाकले असले तरी राजकीय आरोपप्रत्यारोप मात्र सुरूच आहेत. सध्या करोनामुळे मोडकळीस आलेल्या आरोग्यव्यवस्थेवरून राजकीय चिखलफेक सुरु असल्याचं दिसतंय.
अशातच समाज माध्यमांवर आरोग्यव्यवस्थेवरून काही दावे करण्यात आले असून त्यांची सत्यता आपण आज पडताळणार आहोत. सध्या समाजमाध्यमांवर एक इन्फोग्राफिक मोठ्या प्रमाणात शेअर केलं जातंय. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात आतापर्यंत १५ एम्स रुग्णालये उभारण्यात आली असल्याचा दावा करण्यात आलाय. तसेच, मनमोहन सिंग हे १० वर्षे पंतप्रधान असताना केवळ १ एम्स रुग्णालय उभारल्याचेही यात सांगण्यात आलंय.
During his 10 years of subservient post of PM. Manmohan singh just managed to open 1 AIIMS that too in Italian Mata’s Constituency.
If MMS is so great let him fix CONgress states starting with horrible #COVIDEmergency in Maharashtra & Chattisgarh. pic.twitter.com/3arXiwxlVJ
— Arun 🇮🇳 (ಅರುಣ್) (@arunpudur) April 19, 2021
भाजपच्या अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हे इन्फोग्राफिक शेअर केले असून यामाध्यमातून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजप नेते नंद किशोर यादव, अरुण पुदुर, अभिषेक द्विवेदी यांनी आपल्या ट्विटर खात्यांवर असे दावे केले आहेत.
ये आंकड़े देखने के बाद भी क्या कांग्रेसी और विपक्षी दल मोदी सरकार को ही बदनाम करेंगे….#ModiSarkar #India pic.twitter.com/VfypYCARwy
— Nand Kishore Yadav (@nkishoreyadav) April 24, 2021
मात्र याची खातरजमा केली असता हे दावे दिशाभूल करणारे असल्याचे निष्पन्न झाले.
१९५६मध्ये देशाच्या पहिल्या आरोग्यमंत्री अम्रित कौर यांच्या कारकिर्दीत भारतात पहिले एम्स रुग्णालय दिल्ली येथे उभारण्यात आले होते. त्यानंतर आजपर्यंत देशात ६ एम्स रुग्णालये पूर्णतः कार्यान्वित करण्यात आली आहेत.
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या सरकारतर्फे २००३मध्ये प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना आखण्यात आली होती. या योजनेचा उद्देश, ‘देशातील सर्व भागांमध्ये परवडण्याजोगे उपचार घेता यावेत यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे व वैद्यकीय शिक्षणाचा स्तर उंचावणे’ हा होता.
अटल बिहारी वाजपेयी यांनी २००३ सालच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये, “दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी ६ रुग्णालये येत्या ३ वर्षांमध्ये मागास राज्यांमध्ये उभारली जातील.” असं सांगितलं होत. मात्र ९ महिन्यांमध्येच वाजपेयी यांचं सरकार कोसळलं.
याबाबत द न्यू इंडियन एक्सप्रेसने २०११मध्ये दिलेल्या एका वृत्तामध्ये, “एनडीए सरकारने केलेली ही घोषणा केवळ निवडणूकभिमुख ठरली. ऑक्टोबर २००३ ते मार्च २००४ या काळात केवळ भूमिपूजनाचा कार्यक्रम झाले. या काळात जमिनीचे हस्तांतरण देखील केले गेले नाही.”
“२००६मध्ये जेव्हा केंद्रात युपीए सरकार आलं तेव्हा या कामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची परवानगी मिळाली. यानंतरही हे काम सुरु व्हायला २००९ उजाडलं. या कामासाठीच्या कंत्राटदारांची निवड जून २०१०मध्ये झाली.”
पहिल्या टप्प्यातील ही सहा नवी एम्स रुग्णालये भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर, पटना, रायपूर आणि ऋषिकेश येथे उभारण्यात आली. पीएमएसएसवाय या संकेस्थळावर नमूद केल्याप्रमाणे २०१२ मध्ये येथे एमबीबीएस अभ्यासक्रम सुरु झाला. तर २०१३मध्ये परिचारिका अभ्यासक्रमास सुरुवात करण्यात आली.
विशेष म्हणजे यूपीए आणि एनडीए या दोन्ही सरकारांच्या शासन काळात टप्प्याटप्प्याने या संस्थांचे काम पुढे सरकले. उदाहरणार्थ, २०१३मध्ये भोपाळ येथील एम्समध्ये वैद्यकीय महाविद्यालय व आऊट पेशंट डिपार्टमेंट (ओपीडी) सेवा सुरु झाली. तर २०१४मध्ये इन पेशंट डेपार्टमेंट (आयपीडी) व २०१७मध्ये वॉर्ड सुरु करण्यात आले.
२०१९मध्ये कॅगने दिलेल्या अहवालानुसार या संस्थांमधील पायाभूत विकास अद्यापही रखडला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे व्हायरल दाव्यामध्ये, ज्या सहा एम्स रुग्णालयांचे श्रेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना देण्यात येत आहे, ती रुग्णालये काँग्रेसच्या काळात उभारण्यात आली आहेत.
गतवर्षी कुटुंब कल्याण आरोग्य मंत्रालयाचे राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी, “पीएमएसएसवाय अंतर्गत २२ एम्स उभारण्याबाबत मान्यता/ घोषणा करण्यात आली आहे. यातील सहा (भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर, पटना, रायपूर आणि ऋषिकेश) ही पूर्णपणे कार्यरत असून बाकी १६ उभारण्यात येत आहेत.” अशी माहिती दिली होती.
या १६ रुग्णालयांतील रायबरेली येथील रुग्णलयाला मनमोहन सिंग पंतप्रधान असताना परवानगी मिळाली होती. तब्बल १० वर्षांनंतर (ऑगस्ट २०१८) या रुग्णालयातील ओपीडीचे काम सुरु झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेली इतर १५ एम्स रुग्णालये सध्या विविध टप्प्यांवर आहेत. यातील काही रुग्णालयांमध्ये ओपीडी व वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे.
व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची शहानिशा केल्यानंतर हे दावे दिशाभूल करणारे असल्याचं आढळतं. देशात सध्या ७ एम्स रुग्णालये पूर्णपणे कार्यरत आहेत. यातील ६ रुग्णालयांची घोषणा भाजपच्या काळात झाली मात्र त्यांची उभारणी काँग्रेस सत्तेत असताना करण्यात आली. रायबरेली येथील एम्स रुग्णालय देखील काँग्रेसच्या काळातच उभारण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेली १५ एम्स रुग्णालयांमधील काही अंशतः कार्यरत आहेत तर काहींचे बांधकाम सुरु आहे.