औरंगाबाद – राज्यातील करोना स्थिती हाताबाहेर गेली आहे. ऑक्सिजन बेड मिळत नसताना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेले रेमडेसिविर देखील आता मिळत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आहे. त्यातच रेमडेसिविरचा काळाबाजार होत आहे. यावरून औऱंगाबादचे खासदार इम्तियाज जलील संतप्त झाले आहेत.
सध्याचा काळ कठीण आहे. अशा काळात रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांची माहिती द्या, त्यांना रस्त्यावर पळवून मारू, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते येथील माध्यमांशी बोलत होते.
जलील म्हणाले की, औऱंगाबाद शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार करण्यात येत आहे. काही लोक आणि काही मेडिकल चालक यात सहभागी आहेत. त्यामुळे आम्ही जनतेला आवाहन करतो की, अशा प्रकारे कोणी काळाबाजार करत असेल तर त्याची माहिती आम्हाला द्यावी. आम्ही त्याला रस्त्यावर पकडून मारू, मी स्वत: अशा लोकांना बुटाने मारेन असंही जलील म्हणाले. दरम्यान सध्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. या काळात चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अद्दल घडली पाहिजे, असंही खासदार जलील यांनी म्हटलं.