नवी दिल्ली – जुलैमध्ये देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. अशा स्थितीत राष्ट्रपतीपदाच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. महात्मा गांधी यांचे नातू गोपाळकृष्ण गांधी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा उमेदवारी प्रस्ताव नाकारला आहे. आत्तापर्यंत त्यांच्यासह विरोधी पक्षांच्या चार संभाव्य उमेदवारांनी विरोधी पक्षांचा प्रस्ताव फेटाळला आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आपल्या नावाचा विचार केल्याबद्दल त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी विरोधकांनी राष्ट्रीय एकमत घडवावे, असे ते म्हणाले. माझ्यापेक्षा चांगले काम करणारे आणखी अनेक नेते असतील, त्यांच्या नावाचा विचार करावा, असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे, यापूर्वी महात्मा गांधींचे नातू गोपाळकृष्ण गांधी हे विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावल्याने या शक्यतांना आणखी बळ मिळाले. त्यानंतर विरोधकांच्या वतीने त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याच्याही माहिती समोर आली होती आणि गोपाळ कृष्ण गांधी यांनी या प्रस्तावावर विचार करण्यासाठी वेळ मागितला होता. त्याचवेळी, आज म्हणजेच सोमवारी(दि.20) स्वत: गोपाळ कृष्ण गांधी यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. यापूर्वी, गोपालकृष्ण गांधी हे 2017 मध्ये विरोधी पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते, तेव्हा त्यांना भाजपचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
दरम्यान, काही दिवसांनी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. मात्र, उमेदवाराबाबत विरोधकांमध्ये आतापर्यंत एकमत झालेले नाही. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यास नकार दिला होता. यानंतर एच डी देवेगौड़ा आणि फारुख अब्दुल्ला यांनीही नकार दिला.