नवी दिल्ली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी प्रथम वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. राष्ट्रपतिपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून त्यांनी राष्ट्रपती भवनात आणि विविध राज्यांच्या दौऱ्यांत सुमारे 16 हजार व्यक्तींची भेट घेतली.
राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च पद भुषवण्याचा बहुमान मिळणाऱ्या मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला आहेत. राष्ट्रपती बनल्यानंतर त्यांनी भेट घेतलेल्यांमध्ये आदिवासी गटांच्या 1 हजार 750 सदस्यांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळातील पहिल्या वर्षात विविध राज्यांचे दौरे केले.
त्यामध्ये ईशान्येकडील 8 पैकी 6 राज्यांचा समावेश आहे. अरूणाचल प्रदेश आणि मिझोराम राज्यांच्या विधानसभांमध्ये त्यांची भाषणे झाली. मुर्मू यांनी आतापर्यंत केंद्र सरकारच्या 20 विधेयकांना मान्यता दिली. तसेच, राज्य सरकारांच्या 23 विधेयकांवर शिक्कामोर्तब केले. पारदर्शकता, सक्षमतेवर त्यांचा नितांत विश्वास आहे.
राष्ट्रपती भवन आणि जनतेमधील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी तंत्रज्ञान-नवतेची कास धरण्याचा त्यांचा आग्रह नेहमीच असतो. दरम्यान, एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुर्मू यांचे अभिनंदन केले.