नवी दिल्ली – देश “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा करत आहे. उद्या,या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन मुख्य सोहळा होणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होईल आणि त्यानंतर ते लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करतील. पंतप्रधानांनी मार्च 2021 मध्ये, गुजरातमधील साबरमती आश्रमातून “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी अभियानाची’ सुरुवात केली होती. हा उत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु राहणार आहे.
उद्या सकाळी लाल किल्ल्यावर तिन्ही सैन्यदल प्रमुख आणि दिल्ली पोलिस गार्ड पंतप्रधानांना सलामी देतील. यानंतर, पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर, राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामी दिली जाईल.
या कार्यक्रमात, सुवर्णपदक विजेता भालाफेक पटू नीरज चोप्रासह 32 ऑलिंपिक विजेते खेळाडू देखील सहभागी होणार आहेत. त्याशिवाय, साई- म्हणजेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे दोन अधिकारी यांना उद्याच्या कार्यक्रमाचे विशेष आमंत्रण देण्यात आले आहे.
तसेच इतर 240 ऑलिंपिक खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि साईचे अधिकारी यांना लाल किल्ल्यासमोरच्या ज्ञान पथाची शोभा वाढवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय खेळांडूनी यंदाच्या टोकियो ऑलिंपिकमध्ये आजवरची सर्वोत्तम, कामगिरी करत एक सुवर्ण,दोन रौप्य आणि चार कांस्य पदके पटकावली आहेत.
तसेच कोविड-19 विरोधातल्या लढ्यात, ज्यांनी आघाडीवर राहून कर्तव्य बजावणाऱ्या सर्व करोना योध्यांसाठी यावेळी स्वतंत्र आसनव्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिन सोहळ्यात, पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर, या संपूर्ण स्थळावर हवाई दलाच्या एमआय 17 1 व्ही हेलिकॉप्टरने, पुष्पवृष्टि केली जाईल.
पुष्पवृष्टी झाल्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्राला उद्देशून भाषण संपल्यानंतर राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स राष्ट्रगीत गातील. विविध शाळांमधील एनसीसीचे 500 कॅडेट्स या कार्यक्रमात सहभागी होतील.