नुकताच पितृपक्ष संपला. अनेकांनी परंपरेप्रमाणे आपल्या आई-वडिलांचे, आजी-आजोबांचे, काका व इतर नातलगांचे विधिवत श्राद्ध करून कावळ्यासाठी पानं ठेवली असतील. पण सगळ्याच परंपरा योग्य असतात का? याचा विचार कधी करणार? मी कोणाला तरी विचारलं की, “तुम्ही पान नेमकं कोणासाठी ठेवता? कारण शरीराची तर राख झाली आहे आणि आत्मा असला किंवा मानला तर एकतर तो मुक्त झाला असेल किंवा त्यानं पुनर्जन्म घेतला असेल. यावर तो म्हणाला, “ह्या आमच्या श्रद्धा आहेत.’ माझा तर कोणाच्या श्रद्धा दुखावण्याचा हेतू नाही. खर्च वाचवावा असा उद्देश नसून त्याचा सदुपयोग व्हावा एवढंच वाटतं.
एकजण म्हणाला, “ही पक्ष्यांवर भूतदया आहे.’ मग मला बोलावंच लागलं, “ही भूतदया वर्षभर दाखवा, फक्त पितृपक्षात कशाला?’ आणि भूतदयेखातर पक्ष्यांना काहीच देऊ नये. त्यांना तयार अन्न मिळण्याची सवय झाली तर त्यांची अन्न शोधून पोट भरण्याची क्षमता नाहीशी होते. तयार अन्नानं त्यांचं चिमुकलं पोट बिघडलं तर? त्यावर इलाज काय? आणि एक दिवस तयार अन्न मिळालं नाही आणि मिळवण्याची क्षमताही गेली तर त्यांच्या होणाऱ्या उपासमारीला आपण माणसंच नाही का जबाबदार? मग अशी भूतदया न दाखवणं चांगलं- खरं तर त्यांना तयार अन्न न देणं हीच भूतदया आहे.
मागच्या वर्षी तर कोणीतरी पानात ठेवलेलं अन्न पक्ष्यांनी खाल्लंच नव्हतं. मग ते पान आठवडाभर तिथंच पडून होतं. म्हणजे अन्नाचाही नाश. नानकांची गोष्ट तर आपल्याला हेच शिकवते ना? लोकांना श्राद्ध करताना पाहून त्यांनी विचारलं, “हे काय करताय?’ लोक म्हणाले, “आमच्या पितरांना स्वर्गात अन्न पाठवतोय.’ हे ऐकून त्यांनी नदीबाहेर पाणी टाकायला सुरुवात केली. लोकांनी विचारलं, “हा काय वेडेपणा? पाणी का बाहेर उडवताय?’ नानक उत्तरले, “माझी पाच मैलांवर शेती आहे. त्याला पाणी देतोय.’ लोक म्हणाले, “हा तर पूर्णच वेडा आहे. इतक्या लांबून शेतीला पाणी जाईल का?’ यावर ते म्हणाले, “जर तुमचे अन्न पृथ्वीवरून स्वर्गात पितरांना पोचू शकतं तर माझं पाणी शेतीपर्यंत का नाही जाणार?’
प्रश्न तर बिनतोड होता. लोकांकडे या प्रश्नावर उत्तर नव्हतं.
गेल्या महिन्यात आमच्या ओळखीचे एक सद्गृहस्थ वृद्धापकाळामुळे निधन पावले. माझ्या पत्नीनं त्यांच्या कुटुंबीयांना परंपरेप्रमाणे टॉवेल, रुमाल वगैरे न देता ते पैसे कीर्तनसंस्था, अंधश्रद्धा निर्मूलन या संस्थांना देणगी म्हणून दिले.
पुण्यात एक संस्था पितृपक्षात एक प्रदर्शन भरवते. काही लोक श्राद्ध न करता चांगले कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना देणग्या देतात. ती संस्था या प्रदर्शनात कोणतेही भाडे न आकारता अनेक संस्थांना मोफत जागा देते व लोक त्या संस्थांचे कार्य पाहून त्यांना देणगी देतात.
यामुळे केवळ शहरातल्याच नव्हे तर खेड्यातल्या पण आरोग्य, शिक्षण, सेवा, पर्यावरण असं काम करणाऱ्या अनेक संस्थांना लोकांच्या देणग्या मिळतात व ते काम पुढे सुरू राहते. हा उपक्रम पुण्यात सुमारे पंधरा वर्षं सुरू आहे.
खरं श्राद्ध तर हेच नाही का? त्यांच्या स्मरणासाठी वृद्ध किंवा अनाथ मुलं, भिक्षेकरी यांना जिवतंपणी मदत करणं? आणि जर आत्म्याला समाधान मिळणार असेल तर ते अन्न देण्यापेक्षा अशी मदत करून जास्त मिळेल ना? मग असा वेगळा विचार आपण का करू नये? स्मरण ठेवणं महत्त्वाचं आहे, विधी करणं नाही. अनेक चांगल्या संस्थांना गरज आहे आर्थिक मदतीची. म्हणून श्राद्ध तर करावंच फक्त चांगल्या कामाला मदत करून एवढं म्हणणं.