काही वेळा महत्त्वाच्या प्रसंगी आपण एखादं चुकीचं विधान करतो. मात्र त्यावरच कुणी आपली लायकी किंवा अर्हता ठरवली तर ते अयोग्य होईल. असंच काहीसं माझ्या बाबतीत एकदा घडलं. ही घटना खूप म्हणजे सुमारे 45 वर्षांपूर्वी घडली.
मी तेव्हा पुण्यातील एका मोठ्या कंपनीत ज्यूनिअर इंजिनिअर या हुद्द्यावर काम करीत होतो. या नोकरीत कष्ट खूप होते पण चांगला अनुभव मिळत होता. तीन पाळींमध्ये काम करावं लागे. सुरुवातीला तर घरापासून फॅक्टरी हे सुमारे 20 किमी अंतर सायकल किंवा बसनं स्टेशन, तिथून लोकल आणि मग पुढं पायी असा प्रवास करून गाठावं लागे. पावसात आणि थंडीत फार पंचाईत होई. नोकरीत कायम झाल्यावर बसचा पास मिळाला पण गर्दीमध्ये दाटीवाटीत बसून किंवा उभं राहून प्रवास करावा लागे. कॅंटीनचं अन्न हा एक मोठा विनोदच होता.
माझं काम उष्ण-प्रक्रिया किंवा ज्याला इंग्रजीत हीट ट्रीटमेंट म्हणतात त्या खात्यामध्ये होतं. या खात्यात इतर प्रक्रियांबरोबर दातेरी चक्रं (गिअर) कठीण करण्याचं एक प्रमुख आणि काहीसं गुंतागुंतीचं काम होत असे. गिअर आणि इतर काही भाग एका बंदिस्त आणि विशिष्ट वायूंच्या वातावरणात काही तास तापवले जात. यामुळे गिअर्सच्या पृष्ठभागातील कार्बनचं प्रमाण वाढत असे. ते थंड करून नंतर पुन्हा थोडा वेळ तापवून तेलात बुडवले जात. यामुळे गिअरचा पृष्ठभाग अतिशय कठीण होऊन वापरात झीज कमी होते आणि त्यांचा कार्यकाळ खूप वाढतो. प्रक्रियेच्या कालावधीवर गिअरच्या पृष्ठभागावरून किती खोलवर कार्बन गेला आहे हे अवलंबून असतं. त्यामुळे भट्टीच्या एका बाजूनं एक पोलादी सळई आत ठेवली जाई. अंदाजे हवी तशी कार्बनची खोली (किंवा जाडी) प्राप्त झाली असं वाटलं की ती सळई काढून तिच्यातील कार्बनची खोली तपासली जाई. हवी तेवढी खोली मिळाली तरी आम्ही गिअर आणि इतर भाग सुमारे अर्धा तास जास्त वेळ भट्टीत ठेवीत असू.
एक वर्ष बेकार राहून मिळालेली नोकरी टिकवून ठेवणं आवश्यक असल्यानं सर्व समस्यांना तोंड देत माझी नोकरी चालू होती. पगारही यथा-तथाच होता पण इलाज नव्हता. दरम्यान उपजीविकेच्या क्षितिजावर एक आशेचा किरण प्रकट झाला. कोल्हापूरच्या एका इंजिनिअरिंग कंपनीला मी जे काम करीत होतो त्यातला अनुभव असलेल्या इंजिनिअरची गरज होती. त्यांनी तशी जाहिरात वृत्तपत्रात दिली होती. मी त्यांच्या सर्व अपेक्षांमध्ये फिट्ट बसत होतो. मी अर्ज केला. अपेक्षेप्रमाणे मला मुलाखतीला बोलावण्यात आलं.
मुलाखत घेणारे अधिकारी उच्चशिक्षित होते. त्यांनी धातुशास्त्रात जर्मनीमधून डॉक्टरेट केली होती. तरीही माझ्यावर दडपण नव्हतं. काही प्रश्नांनंतर त्यांनी मला तो परिवर्तक प्रश्न विचारला. भट्टीत कार्बनवर्धनासाठी मिश्रधातू पोलादाचे भाग ठेवले आहेत आणि साध्या पोलादाचे भागही आहेत तर कुठल्या भागांचं कार्बनवर्धन लवकर होईल असा तो प्रश्न होता.
वर सांगितल्याप्रमाणे माझ्या रोजच्या कामात आम्ही साध्या पोलादामध्ये हवं तेवढं कार्बनवर्धन झाल्यावरही मिश्र-पोलादाच्या गिअर्सना अर्धा तास अधिक देत होतो. याचाच अर्थ असा की साध्या पोलादाचं वर्धन लवकर होतं. मी तसंच उत्तर दिलं. अधिकारी हसले. माझं चुकलं आहे हे त्यांनी चांगल्या सभ्य भाषेत सांगितलं असतं तर मी समजू शकलो असतो. परंतु त्यांनी माझ्यावर जोरदार हल्ला चढवला. तुला कुणी अभियंता बनवलं? तुझी अभियंता या हुद्द्यावर कुठंही नोकरी करण्याची लायकी नाही असं ते म्हणू लागले. पुराव्यादाखल त्यांनी माझ्यासमोर एक जर्मन पुस्तक जवळजवळ फेकलंच आणि त्यातील एक पान उघडून वाचायला सांगितलं. पुस्तक जर्मन भाषेतलं असलं तरी ते म्हणत होते त्याला पुष्टी देणारा मजकूर त्यात होता. म्हणजेच माझं विधान जरी अनुभवाला अनुसरून असलं तरी चूक होतं. मी निमूटपणानं त्यांची सरबत्ती सहन केली. नंतर एक-दोन प्रश्न झाले. त्यात एकदा त्यांनी फिकच्या विसरण (ऊळषर्षीीळेप) नियमाचा पूर्णपणे चुकीचा उल्लेख केला. मी त्यावर काही बोललो नाही कारण मी त्यांच्याकडून खूप शाब्दिक मार खाल्ला होता. मुलाखतीचा मध्य आल्यावर ते म्हणाले, मी एक छोटंसं काम करून जेवायला जातो, तुम्हीही माझ्या असिस्टंटबरोबर कॅंटीनमध्ये जेवायला जा. जेवणानंतर पुन्हा भेटू. त्यांचा असिस्टंट मला कॅंटीनला घेऊन जायला आला. तेव्हा मी संदर्भाचं जर्मन पुस्तक चाळत होतो. मी असिस्टंटला जरा थांबायला सांगितलं. अचानक मला एका पानावर फिकच्या नियमांचं पान सापडलं. त्यातील मजकुराप्रमाणे अधिकारी महोदयांचं विधान पूर्णपणे चुकीचं होतं. मी ते पान खूण करून ठेवून दिलं आणि जेवायला गेलो.
भोजनानंतर आम्ही मुलाखतीला पुन्हा आमने-सामने आलो. मी शांतपणे अधिकारी मजकुरांना त्यांच्या विधानाची आठवण करून दिली. त्यासरशी त्यांनी पुन्हा त्याबाबत चुकीचं विधान केलं. मी त्यांच्याच “स्टाइल’मध्ये त्यांच्या पुढ्यात जर्मन संदर्भग्रंथ ठेवला आणि अमुकअमुक पान उघडा असं सांगितलं. त्यांचं विधान चुकीचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं.
पण मी आता त्यांना सोडणार नव्हतो. माझ्या इज्जतीचा फालुदा झालेलाच होता तेव्हा मला गमावण्यासारखं काहीच नव्हतं. मी तर नालायक अभियंता आहेच पण आपल्याला कुणी डॉक्टरेट दिली? त्या जर्मन विद्यापीठाची अर्हता तपासून पाहिली पाहिजे या शब्दात मीही त्यांची खिल्ली उडविली. अधिकाऱ्याचा चेहरा खर्रकन् उतरला. एखाद्या विधानाच्या चुकीवरून योग्यता अजमावू नये. प्रत्यक्ष जीवनात शितावरून भाताची परीक्षा होतेच असं नाही असं सांगून त्यांनी माझी माफी मागितली आणि मैत्रीचा हात पुढे केला. मीही उदार मनानं मागील संवाद विसरून त्यांची मैत्री स्वीकारली.
तुमची मुलाखत आता मुख्य व्यवस्थापक घेतील. ते तुम्हाला पगार खूप कमी करून सांगतील. मात्र तुम्ही तो स्वीकारू नका आणि खुशाल वाढीव पगाराची मागणी करा. मी तुमची शिफारस केलेलीच आहे, असं सांगून त्यांनी मला मुख्य व्यवस्थापकांकडे पाठवलं. मला नेमणुकीचं पत्र आलं पण पगार अपेक्षेप्रमाणे नसल्यानं मी ती नोकरी स्वीकारली नाही. मात्र ते अधिकारी नंतर काही काळ मैत्रीपूर्ण संपर्कात राहिले. शितावरून भाताची परीक्षा व्यवहारात कधीही करू नये हा धडा त्यांना मिळाला होता. आणि मलाही!
श्रीनिवास शारंगपाणी