मुंबई – काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी एकांतवासात जात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर खासदार कोल्हे पक्षांतर करणार की, राजकारणातून संन्यास घेणार अशा अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता खासदार कोल्हे एकांतवासातून बाहेर आले असून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं.
अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, मी ७ नोव्हेंबरला सोशल मीडियावर माझ्या एकांतवासाविषयी पोस्ट केली. त्यानंतर चर्चेला उधाण आलं. माझ्या राजकीय संन्यास आणि पक्षांतराचे तर्क लावले गेले. यावर झालेली चर्चा, तर्क पाहिल्यानंतर मीच उलगडा करण्याचं ठरवलं.
“मला मानसिक आरोग्याविषयीची गरज अधोरेखित झाली. मानसिक थकवा मला सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते. ऐन तिशीतील तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, पस्तीशीत मधुमेहाची सुरुवात अशा अनेक गोष्टी आपल्या कानावर येतात. ह्रदय विकार, मधुमेह, डोकेदुखी, पोटाचे आजार ते मानसिक विकार, अस्थमा अशा अनेक आजारांचं मूळ कारण मानसिक तणाव हेच आहे. लोक प्रतिनिधी, अभिनेता म्हणून नाही तर डॉक्टर या नात्यानं मी हे सांगतोय,” असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.
चर्चा, तर्कवितर्क, विश्लेषणं…
नेमकं काय आहे एकांतवासाचं कारण ?एकांतवासाचा उलगडा..!!
खालील लिंकला क्लिककरून “अमोल ते अनमोल” हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
__________https://t.co/AwfZlDF8ZH #AmolteAnamol #अमोलतेअनमोल— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) November 13, 2021
लहानपणापासून शिकवलेलं पुरुषांनी कधी रडायचं नाही. पुरुषांनी आपल्या भावना सार्वजनिकपणे व्यक्त करायच्या नसतात. या सर्व संस्कारातून एक गैरसमज रुढ होतो. त्यानंतर स्पर्धा सुरू होते. मग आपण धावतो. लोक काय म्हणतील या भितीने आपण धावतो. अनेकदा मानसिक तणाव येतो. अशा स्थितीत व्यक्त होणं गरजेचं आहे. हे जीवंतपणाचे लक्षण आहे. आजच्या काळात ते जास्त महत्त्वाचं असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं.
दरम्यान एकांतवासात मी काय केल अन् काय निर्णय घेतला हे येणाऱ्या काळात तुम्हाला समजेलच. आपली वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी, ध्येय निश्चितीसाठी आणि तो मार्ग ठरवण्यासाठी अंतर्मुख होणं गरजेचं असतं. तसाच मी काही काळ अंतर्मुख होतो. स्वतःचं यूट्यूब चॅनल ‘अमोल ते अनमोल’. हा चॅनल सबस्क्राईब करा,” असं आवाहनही अमोल कोल्हे यांनी केलं.