नवी दिल्ली – करोना महामारीच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. यादरम्यान अनेकांच्या हातचे काम गेले होते तर अनेक जण बेरोजगार झाले होते. अशा कठीण काळात देशातील गरीब जनतेला आधार म्हणून केंद्र सरकारने करोना काळात गरिबांना मोफत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत रेशन पुरविले आहे. हे मोफत रेशन नोव्हेंबर 2021 पर्यंत मिळणार आहे. मात्र त्यानंतर हे रेशन मिळणार नसल्याचे संकेत केंद्राकडून देण्यात आले आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत गरीबांना नोव्हेंबरनंतर मोफत रेशन मिळणे कठीण आहे. नोव्हेंबरनंतर या योजनेअंतर्गत गरिबांना रेशन देण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे देशातील गरीबांना आता नोव्हेंबरनंतर रेशनसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
करोनाचा वेग आता मंदावला असून देशात अनलॉकची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे खालावेली अर्थव्यवस्था आता परत सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्याची कोणतीही योजना नाही. आमची ओपन मार्केट सेल स्कीम देखील यावर्षी चांगली राहिली आहे. असे सुधांशू पांडे यांनी सांगितले आहे.
करोना महामारीच्या काळात केंद्र सरकाकडून गरीब कुटुंबांना मोफत रेशन देण्यात येत होते. मार्च 2020 पासून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरु करण्यात आलेली ही योजना जून 2020 पर्यंत लागू करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही करोनाची परिस्थिती सावरली नसल्यामुळे जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती.