राहूल गोखले
राजकीय नेत्यांची मंदिरे बनविण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी भाजपेतर पक्षांच्या नेत्यांची मंदिरे उभारली गेली असल्याची कमी उदाहरणे नाहीत आणि आताही तो पायंडा संपुष्टात आला आहे असे नाही.
महापुरुषांचे पुतळे उभारले जाण्याचा प्रघात जगभर आहे आणि त्यात वावगे किंवा आक्षेपार्ह काही नाही. पुतळे उभारणे ही समाजाकडून त्या महापुरुषाप्रती व्यक्त झालेली कृतज्ञता असते तद्वत पुढच्या पिढ्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा असते.
अर्थात, त्यातही अतिरेक झाला तर पुतळ्यांना देखील व्यक्तिस्तोमाचा दर्प येऊ लागतो हे नाकारता येणार नाही आणि अशा अतिरेकाने प्रेरणा निर्माण होण्याऐवजी शिसारी उत्पन्न होण्याची शक्यता अधिक असते.
अर्थात, याचे भान राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना राहणे कठीण असते याचे कारण अनेकदा असे पुतळे उभारण्यामागे त्या व्यक्तीविषयी असणाऱ्या प्रेमापेक्षा आपल्या भक्तीचे प्रदर्शन मांडण्याची, त्यातून आपला लाभ करून घेण्याची असोशी जास्त असते. पण तरीही पुतळ्यांना सरसकट आक्षेप घेणे योग्य नाही जोवर पुतळा हा मृत व्यक्तीचा असतो.
अर्थात, त्यातही पुतळा आणि मूर्ती यात अंतर आहेच आणि हयात नेत्याचे मंदिर बनविणे हा प्रकार व्यक्तिस्तोमाच्या पुढे जाऊन व्यक्तिपूजेच्या वेशीत प्रवेश करतो. अशी मंदिरे बांधण्यास वरकरणी प्रत्यवाय असण्याचे कारण नाही. कोणी आपली भक्ती कशी व्यक्त करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु आक्षेप घेणे यासाठी गरजेचे बनते की हे प्रकार वैयक्तिक भक्तीचे न राहता समाजमनाचा आरसा बनतात.
मुळातच भारतीय समाज हा व्यक्तिपूजेत आघाडीवर आहे आणि त्यातही सत्तेवर असणाऱ्या नेत्यांना अशा पूजेचा मान अधिक मिळतो. मात्र, त्यातूनच या भक्तीची मर्यादा लक्षात येते. हयात नाहीत आणि सत्तेवर असण्याचा किंवा यापुढे येण्याचा प्रश्न उद्भवत नाही अशा नेत्यांची मंदिरे उभारली जाण्याची उदाहरणे दुर्मिळ दिसतात.
तेव्हा अशी मंदिरे निर्माण करून भक्तीला व्यावहारिकतेचा दर्प येण्याचा संभव असतो. शिवाय माणसांच्या रूपातील नेत्यांना मंदिर बांधून देवत्व बहाल करणे हे अधिक आक्षेपार्ह, वास्तविक देवत्व ज्यांना लाभले असे महापुरुष भारतात कमी नाहीत. लोकमान्य टिळकांसारखे महापुरुष या पंक्तीतले. टिळकांना भगवान टिळक म्हटले जाई. पण टिळकांकडे सत्ता नव्हती; देशात त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती आणि टिळकांविषयी सहानुभूती दाखविणे म्हणजे ब्रिटिशांचा रोष ओढवून घेण्यास निमंत्रण होते. त्या परिस्थितीची आता तुलना करणेही चुकीचे.
मोदींचे मंदिर काय किंवा जगनमोहन रेड्डी यांचे मंदिर काय; देवत्व बहाल करून त्यांचे मंदिरकर्ते नक्की काय साधू आणि सांगू इच्छितात याचा आणि त्यातही राजकीय नेत्यांनी आपल्याला असे देवत्व बहाल केले गेल्याने संतोष पावण्याने ते काय साधतात याचाही शोध घेतला जाणे आवश्यक. मात्र असली अतिरेकी व्यक्तिपूजा माणसांना देवाच्या उंचीवर नेऊन ठेवू लागली तर त्यातून समाजाच्या एका अर्थाने भाबडेपणाचेच नव्हे तर अगतिक मानसिकतेचे दर्शन घडते आणि ते अधिक घातक आहे.
एखाद्याला देव मानले की एकतर आपली जबाबदारी संपते; ज्याला देवत्व दिले जाते त्याने काहीही केले तरी त्याच्या समोर हात जोडण्याचीच अपरिहार्यता आणि त्यापलीकडे जाऊन अगतिकता येते आणि त्यातून सार्वजनिक विवेक आणि तारतम्य हरवायला सुरुवात होते. म्हणूनच प्रश्न पुण्याच्या एका कोपऱ्यातल्या एका मंदिराचा नाही, तो सामाजिक आणि राष्ट्रीय विवेकाचा आणि मुख्य म्हणजे असले पायंडे पडून त्यातून आलेल्या मानसिक अवलंबित्वाचा आहे.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजातील या दोषाचे नेमके निदान केले होते आणि घटना समितीसमोर जे शेवटचे भाषण 25 नोव्हेंबर 1949 रोजी केले होते त्यात नेमक्या याच मुद्द्याला त्यांनी स्पर्श केला होता.
डॉ. आंबेडकर म्हणतात- ज्यांनी आपले आयुष्य देशसेवेत व्यतीत केले त्यांच्याविषयी कृतज्ञ असण्यात चुकीचे काही नाही; पण कृतज्ञतेला देखील मर्यादा असली पाहिजे. आयरिश राष्ट्रभक्त डॅनियलओ कोनेलने म्हटल्याप्रमाणे, कोणताही पुरुष आत्मसन्मानाची किंमत देऊन कृतज्ञ राहू शकत नाही; कोणतीही स्त्री आपल्या शिलाची किंमत देऊन कृतज्ञ राहू शकत नाही आणि कोणतेही राष्ट्र आपल्या स्वातंत्र्याची किंमत देऊन कृतज्ञ राहू शकत नाही. हा धोक्याचा इशारा अन्य कोणत्याही देशापेक्षा भारतासाठी अधिक गंभीर आहे.
कारण भारतीय राजकारणात अन्य कोणत्याही देशाच्या राजकारणापेक्षा व्यक्तिपूजा, भक्ती यांचे प्रमाण प्रचंड आहे. धार्मिकबाबतीत भक्ती मोक्षाला नेत असेल पण राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा हा अधःपतन किंवा अगदी हुकूमशाहीकडे हमखास नेणारा मार्ग आहे. डॉ. आंबेडकर यांचे द्रष्टेपण यातून अधोरेखित होत असले तरी भारतीय समाज त्यापासून काही शिकला आहे का, हा प्रश्न आहे. राजकीय आणि त्यातही हयात नेत्यांची मंदिरे बांधून
डॉ. आंबेडकरांनी इशारा दिलेल्या मार्गावर समाज जाण्याची शक्यता असते आणि आहे आणि म्हणून अशा मंदिरांच्या उभारणीला आक्षेप घेतला पाहिजे.