जळगाव – सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळू शकते. मात्र मध्यावधी निवडणुकांऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता अधिक आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून राज्यातील सरकारचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या फैसल्यावर अवलंबून आहे. यातच पाटील यांनी राज्यातील राजकारणाबाबत मोठा दावा केला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे विधान केले. पाटील म्हणाले की, राज्यातील सरकार मध्यावधी निवडणुकांना घाबरत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील, याचाच प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. बाजार समितीच्या निवडणुका पक्ष म्हणून लढवल्या जात नाही, तर कार्यकर्ता ती निवडणूक लढत असतो आणि इतर निवडणुकीमध्ये मात्र सर्वांना सोबत घेऊन निवडणुका लढाव्यात ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. असे असले तरी परिस्थितीनुरूप स्थानिक जिल्हाध्यक्ष आणि नेत्यांना त्या संदर्भातील अधिकार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महागाईमुळे जनता बेहाल आहे. गरीबांचे जगणे मुश्किल झाले आहे. या समस्येवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून धार्मिक भावना भडकविण्याचे काम सुरू आहे. देशात कुठल्या घोषणा दिल्या ज्याव्यात, काय बोलावे, याचा देखील निर्णय कोर्टच द्यायला लागले असल्यामुळे आता बोलण्याची देखील सोय राहिली नाही, अशी खोचक टीका त्यांनी शिंदे-भाजप सरकारवर केली.