पुणे – दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेले केळी, डाळिंबाचे पीक वाढत्या उन्हामुळे काळे पडू लागले आहे. डाळिंबाला उन्हापासून वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून डाळिंबाला कापडी पिशव्या, साड्यांचे आचछादन करण्यास सुरुवात केली आहे. उन्हाचा चांगलाच फटका बसत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.
अगोदरच पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वाढत्या उन्हामुळेही अधिक संकटात सापडला आहे. कापडी पिशव्या आणून त्याला मजूर शोधावे लागतात. सध्या शिरूर, खेड, जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात मजुर टंचाई जाणवत आहे. उन्हामुळे मजुरही मिळत नाहीत. मजुरांना जास्त पैसे मोजावे लागतात. वाढत्या उन्हामुळे मजुरांकडून कामही कमी प्रमाणात होत आहे. केळी, डाळिंबाला योग्य भाव मिळाला नाहीतर मोठा आर्थिक फटका शेतकऱ्याला सोसावा लागणार आहे.