विश्रांतवाडी परिसरातील भयाण स्थिती; लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
विश्रांतवाडी – विश्रांतवाडी परिसरातील महानपगरपालिकेचे दवाखाने बंद असल्याने सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे. एकीकडे खासगी दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर शासन कारवाईचा बडगा उगारत असताना लाखो रुपयांचा निधी खर्च करून गोरगरिबांसाठी उभारण्यात आलेले येथील पालिकेचे दवाखानेच बंद आहेत. यांच्यावर कारवाई कोण करणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. करोनावर उपचाराच्या रगाड्यात पुणे पालिका प्रशासनाचे पालिकेच्या दवाखान्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
विश्रांतवाडीसह वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील बहुतांश मनपा दवाखाने बंद असल्याची स्थिती आहे. तर, काही दवाखाने फक्त दोन ते तीन तास सुरू असतात. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्दी, खोकला, ताप यासह अन्य आजारांवर उपचार घेणेही सामन्य नागरिकांना कठीण झाले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे आजार बळावत आहेत, अशा स्थितीत पालिकेचे दवाखाने सुरू असणे गरजेचे आहे. परंतु, केवळ करोनाच्या आजारावरच पालिका प्रशासन अडकल्याने अन्य आजाराच्या रुग्णांकडे, दवाखान्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पालिका आरोग्य प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे नागरकांचे म्हणणे आहे. यागोष्टीचा लोकप्रतिनिधींनाही विसर पडला आहे. कोणचाही याबाबीकडे लक्ष नाही. बंद असलेले सर्व दवाखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याने लोकप्रतिनिधी अन्य कामात व्यस्त आहेत.
करोनासारख्या महामारीच्या काळात पालिकेचे सर्व दवाखाने सुरू ठेवणे आवश्यक आहे. विश्रांतवाडी परिसरातील दवाखाने मात्र बंद आहेत. याबाबत पालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने झोपेचे सोंग घेतलेल्या या आरोग्य प्रशासनाला जागे करण्यासाठी आता आंदोलन करावे लागणार आहे.
– विनोद पवार, युवा नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस