कॉंग्रेसला पक्षांतर्गत गटबाजीचे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत कॉंग्रेसला मूळ दिशा सापडणार नाही. पंजाब, गुजरात, कर्नाटकातही पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. गुजरात आणि कर्नाटकात पुढील काळात विधानसभा निवडणुका होणार असल्याने हा अंतर्गत कलह निवळायला हवा.
संघटनात्मक ताकदीच्या मदतीने भाजपने देशात अनेक राज्यांमधील सत्ता मिळवली असल्याने, कॉंग्रेसनेही आपली संघटना बळकट करण्यासाठी कठोर निर्णय घेतले पाहिजेत. तरुण कार्यकर्त्यांचा अधिकाधिक भरणा केला पाहिजे आणि त्यांना निर्णयप्रक्रियेतही सहभागी करून घेतले पाहिजे, असे मत उदयपूर येथे भरलेल्या कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात व्यक्त करण्यात आले. नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटनात्मक सुधारणा कराव्या लागतील.
पक्षाची रणनीती बदलावी लागेल आणि पक्षाच्या दैनंदिन कार्यपद्धतींमध्येही परिवर्तन आणावे लागेल, असा सुस्पष्ट संदेश कॉंग्रेसच्या हगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या शिबिराच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना दिला. “नेत्यांनी आता व्यक्तिगत महत्त्वाकांक्षांना मुरड घालून पक्षाला प्राधान्य दिले पाहिजे, पक्षाचे ऋण फेडण्याची हीच ती वेळ’, असे आवाहनही सोनिया गांधी यांनी केले.
कॉंग्रेसमध्ये चिंतन शिबिरे, उच्चस्तरीय समितीच्या बैठका, त्यांचे अहवाल हे सतत सुरूच असते. प्रश्न असतो, तो अंमलबजावणीचा. ती कधी होतच नाही. पक्षसुधारणांबद्दल ए. के. अँटनी समितीपासून अनेक समित्या झाल्या. परंतु त्यांचे अहवाल धूळखात पडले. जी23 या बंडखोर गटाने विविध सूचना केल्या. त्यानंतर या गटातील काही व्यक्तींबरोबर एक बैठक झाली आणि पुढे काहीच झाले नाही. पक्षात शिस्तीचा संपूर्ण अभाव असून, गुजरातमधील कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी, आपल्याला कोणतेही काम दिले जात नाही आणि विश्वासातही घेतले जात नाही, अशी जाहीर टीका केली आहे.
महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसला असला, तरी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध जाहीर वक्तव्ये करत आहेत. त्यांना रोखण्याचा प्रयत्न कॉंग्रेसश्रेष्ठी करताना दिसत नाहीत. पंजाबात कॉंग्रेस नेतृत्वहीन असून, अक्षरशः लुळी पांगळी झाली आहे, तर राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळे ते अत्यंत नाराज आहेत.
कर्नाटकातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेटमंत्री, कर्नाटक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद माधवराज यांनी आठवड्यापूर्वी पक्षाचा राजीनामा दिला आहे. माधवराज हे कोळी समाजातील असून, 2013 साली उडुपी मतदारसंघातून ते निवडून आले होते. 2016 साली कॉंग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारमध्ये ते युवक, क्रीडा आणि मत्स्यव्यवसाय मंत्री होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माधवराज हे जनतादल सेक्युलर पक्षात सामील झाले होते. जेडीएसची कॉंग्रेसशी युती असल्यामुळे, तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी त्यांच्या जागेसाठी प्रचारसभाही घेतली होती. परंतु भाजपच्या शोभा करंदलाजे यांनी उडुपी-चिकमंगळूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा पराभव केला.
चालू कर्नाटक विधानसभेची मुदत 24 मे 2023 रोजी संपेल. त्यानंतर तेथे विधानसभा निवडणुका होतील. अशावेळी तेथे अँटी इन्कम्बन्सीची लाट तयार होईल की नाही, हे बघावे लागेल. परंतु तेथील भाजपचे बोम्मई सरकार खाली खेचायचे असेल, तर कॉंग्रेसला तेथे स्वतःचे घर दुरुस्त करावे लागेल. तेथील सदस्य नोंदणी अभियान जोरदार सुरू झाले असून, देशात कॉंग्रेससारख्या पक्षाची किती आवश्यकता आहे, हे जनतेवर बिंबवले जात आहे. बोम्मई सरकारमधील काही मंत्र्यांचे घोटाळेही उजेडात आणण्यात आले आहेत. सरकारी कंत्राटे देताना पैसे खाल्ल्याचा आरोप झाल्यामुळे, के. एस. ईश्वरप्पा यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु त्याचवेळी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार (डीकेएस) यांच्याबाबत पक्षात असमाधान व्यक्त केले जात आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, डीकेएस आणि निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील हे एकमताने कारभार हाकत असल्याचे दिसत नाही. पाटील हे राज्याचे माजी गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. “ईएसआय रिक्रुटमेंट घोटाळ्या संदर्भात कॉंग्रसकडून हल्ले झाल्यास, त्यासंदर्भात आपल्याला “सहकार्य’ करावे, यासाठी भाजपचे उच्च शिक्षणमंत्री अश्वत्थ नारायण यांनी नुकतीच पाटील यांची भेट घेतली’, असे उद्गार अलीकडेच डीकेएस यांनी काढले. पाटील हे सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय असून, डीकेएस यांचे हे उद्गार अत्यंत सवंगपणाचे आहेत. अश्वत्थ यांची-माझी भेट राजकीय नव्हती, तर व्यक्तिगत स्वरूपाची होती, असा खुलासा पाटील यांनी केला आहे.
एकीकडे भाजप लिंगायत समाजाच्या काही मागण्या पूर्ण करून आणि त्या समाजातील नेत्यांना पदे देऊन खूश करत आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेस एम. बी. पाटील यांच्यासारख्या लिंगायत नेत्याला टार्गेट करत आहे. भाजपचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यानंतरचे पाटील हे राज्यातील सर्वात लोकप्रिय असे लिंगायत नेते आहेत. सिद्धरामय्या आणि डीकेएस यांच्यातही अनेकदा जाहीर चकमकी होत असतात. वास्तविक राज्यातील ठेकेदार संघटनेने बोम्मई सरकारवर 40 टक्के लाचबाजी केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे बोम्मई सरकार बचावात्मक पवित्र्यात आहे.
बोम्मई हे मुख्यमंत्री म्हणून सुमार वकुबाचे असल्याचेही सिद्ध झाले आहे. अशावेळी कॉंग्रेसने एकदिलाने काम केल्यास, पुढील निवडणुकीनंतर सत्तांतर घडू शकते. मांड्या येथील माजी खासदार आणि अभिनेत्री रम्या ऊर्फ दिव्या स्पंदना हिने पाटील यांना पाठिंबा देणारे ट्विट केले आहे. त्यावर तिलाच पक्ष कार्यकर्त्यांनी ट्रोल केले. दिव्या ही पक्षाच्या समाजमाध्यम विभागाची माजी प्रमुख आहे. ती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तुळातील आहे. तरीदेखील तिला हा अनुभव आला. केवळ सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर टीका करून उपयोगाचे नाही. कॉंग्रेसला आपसातील मतभेद दूर करावे लागतील. अन्यथा कर्नाटकातही कॉंग्रेसचा सफाया होईल.
हेमंत देसाई