रत्नागिरी – कोकणातील राजापूर तालुक्यातील “बारसू’ परिसरात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी असलेला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध मोडून काढत ड्रिलिंगचे काम मंगळवारी सरकारतर्फे सुरू करण्यात आले. या कामाला जोरदार विरोध करणाऱ्या 110 ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये बहुसंख्य महिला आहेत.
या रिफायनरी विरोधात स्थानिकांनी अंदोलन करण्यास सुरुवात केल्या नंतर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून त्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटल्याचे पहायला मिळत आहे.
महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे हा “रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग’ राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे.
गेल्या वर्षीही नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सर्वेक्षणाचे काम ग्रामस्थांनी तीव्र विरोध करुन बंद पाडले होते. म्हणून या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या माती परीक्षणासाठी ड्रिलिंगच्या कामालाही विरोध होणार, याचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनाने गेल्या रविवारपासून बारसूसह आजूबाजूच्या आठ गावांमध्ये संचारबंदी लागू केली होती.
अशा प्रकारे मंगळवारी पोलीस बळाचा वापर करून ड्रिलिंगचे काम सुरू करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले असले तरी स्थानिक ग्रामस्थांचा विरोध लगेच मावळण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुढील काही दिवस या परिसरात तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
किती एकरात प्रकल्प?
राजापूर तालुक्यातील बारसू येथे 3 हजार 400 एकर जमिनीवर क्रूड रिफायनरीचा प्रकल्प प्रस्तावित आहे. बारसू रिफायनरीसाठी चाचण्या करण्यासाठी 84 कूपनलिका खोदायच्या आहेत. तसेच क्रूड टर्मिनलसाठी साठी 501 एकर जमीन लागणार आहे. ही जमिन महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या ताब्यात आहे.