नवी दिल्ली – नेत्यांनी जाळपोळ आणि हिंसाचारामध्ये जमावाचे नेतृत्व करू नये, असे लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या संदर्भात ते बोलत होते. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जाळपोळ आणि हिंसाचारसाठी मार्गदर्शन करू नये.
गर्दीतूनच नेतृत्व तयार होते. मात्र चुकीच्या दिशेने लोकांना नेणारे नेते होऊ शकत नाहीत. जे लोकांना चांगल्या मार्गाने पुढे घेऊन जातात, तेच नेते होतात, असे ते म्हणाले.
या महिन्याच्या सुरुवातीला संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले, तेंव्हापासूनच आंदोलन, हिंसाचर आणि जाळपोळीच्या घटना देशभर घडत आहेत. या आंदोलनादरम्यान अनेक जण जखमी झाले, तर काहींचा मृत्यूदेखील झाला. विशेषतः उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये हे आंदोलन अधिक तीव्र होते.
“नेतृत्व जर खरोखर पुढे घेऊन जाण्यासाठी असेल, तर ते एवढे जटिल का आहे. कारण पुढे जाणाऱ्याच्या मागूनच त्याचे अनुयायी येत असतात. पण हे दिसते इतके सोपे नाही. हे एक गुंतागुंतीचे समिकरण आहे.’ असे लष्कर प्रमुख म्हणाले.