न्हावरे -जिल्ह्यातील प्रत्येक गावातील तळीरामांची नावांसह माहिती गावातील पोलीस पाटलांकडून संकलित करण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाने करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तळीरामांची दखल घेतली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत लेखी आदेश काढला असून, सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, पंचायत समितींचे गट विकास अधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी आदेशाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावात दररोज दारू पिणाऱ्या व्यक्तींची नावे गावचे पोलीस पाटील संकलित करणार आहेत. पोलीस पाटलांनी संकलित केलेल्या नावांची माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकाऱ्यांच्याकडे देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेने करोना महामारीपासून वाचण्यासाठी तळीरामांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही तज्ज्ञांच्या मते करोनामुळे मृत्यू झालेले नागरिक कायमस्वरूपी दारूचे व्यसन करणारे होते.म्हणूनच अशा नागरिकांवर सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
त्यामुळे गावातील तळीरामांची माहिती करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या उपयोगी येणार आहे. तळीराम एकटे दारू पीत नाहीत. त्यांना दारू पिताना सोबत लागते. तसेच दोनपेक्षा अधिक तळीराम एकत्र येऊन दारू पितात. तळीरामांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. गावठी दारू पिताना अनेक तळीराम एकाच ग्लासचा वापर करतात. त्यामुळे करोनाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
“त्या’बाबत दुजोरा नाही
कायमस्वरूपी दारू पिणरे, कधी तरी दारू पिणारे, गावठी दारू पिणारे, देशी दारू पिणारे तसेच विदेशी दारू पिणारे अशी वर्गवारी तयार करण्यात येणार आहे की नाही याबाबतच्या माहितीला प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही, त्यामुळे सध्या तळीरामांची माहिती गोळा करण्याचे काम पोलीस पाटील मोठ्या जोमाने करताना दिसत आहेत.